Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग हादरला होता. गेली पाच वर्षे ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या चढाव-उतारांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. असं असलं तरी या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूप मोठा आहे. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेमही करताना दिसतात. दरम्यान मालिकेतल्या कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. मात्र आता इतकी वर्ष प्रेक्षकांवर भरभरुन प्रेम करणारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी मालिकेतील प्रत्येक कलाकारांचे आणि इतर टीमचे आभार मानले आहेत.
मिलिंद यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “मी मिलिंद गवळी. ‘स्टार प्रवाह’ परिवार आणि Director’s Kut Prodn, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची ‘आई कुठे काय करते’ ही ‘स्टार प्रवाह’वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४. हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात स्टार प्रवाहने ‘आई कुठे काय करते’चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा मालिका पाहिली, ती इतकी भावली की अक्षरशः या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं”.
पुढे त्याने असं म्हटलं की, “आमच्यावर भरभरुन प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि ‘स्टार प्रवाह’चे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, ‘स्टार प्रवाह’ने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन मग ते ‘होऊ दे धिंगाणा’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करुन जाहिरातही केली. DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही ४५ ते ५० वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम, पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरुम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉपवरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही. नमिता वर्तक यांची कथा-पटकथा खूप भारी होती, या मालिकेचे संवाद छान असायचे”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार. या मालिकेमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले. आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश, इशा,अनघा, विमल, शेखर, विशाखा, आरोही, गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी या सर्वांचा आभारी आहे”.