छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका टीआरपीच्या यादीत कायम टॉप १०मध्ये असते. या मालिकेतील नकारात्मक भूमिका साकारणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. त्यांनी या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. नुकताच या मालिकेतील सर्व कलाकारांनी स्ट्रार प्रवाहच्या गणेसोत्सव कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. यावेळी मिलिंद गवळी यांनी गणेशोत्सवाच्या त्यांच्या बालपणातील आठवणी सांगितल्या त्याचबरोबर सणासुधीला पावित्र्य राखणं किती गरजेचं आहे याविषयावर वक्तव्य केलं. (milind gawali reaction on ganpati festival)
स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच गणोशोत्सव सोहळा साजरा झाला. या कार्यक्रमात मिलिंद यांनीही हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी तारांगणला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची बालपणीची गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या. मिलिंद म्हणाले, “लहानपणी या सण, उत्सवांचं मला खूप वाईट वाटायचं. कारण माझे वडील या दिवसांना कधीच घरी नसायचे. ते पोलिस अधिकारी असल्यामुळे त्यांना नेहमी बंदोबस्त करायचा जाव लागायचं. ज्यावेळी पोलिसांची जिथे गरज असायची तिथे ते रात्रोरात्र जागून हजर असायचे. गणेश विसर्जनाच्या वेळी त्यांचे खूप हाल व्हायचे. कारण पुर्वी मुलं विसर्जनावेळी दारु पिऊन दंगामस्ती करायचे. जे मला कधीच आवडलं नाही”.
पुढे मिलिंद म्हणतात, “मी आजही लोकांना सांगतो की, गणोशोत्सव हा खूप पवित्र सण आहे. सार्वजनिक गणपती या संकल्पने मागे लोकमान्या टिळकांचा उद्देश खूप वेगळा आहे. पण त्याबद्दल लोकांना फारसं काही माहित नाही. आपल्याला ८ ते १० दिवस सुट्ट्या मिळतात. मग आपण मंडप टाकतो. व गणेशोत्सवाच्या नावाखाली त्यात पत्ते खेळत बसायचे. पण हे सगळं बंद व्हायला पाहिजे”.
ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे हे सांगताना ते पुढे म्हणतात, “अशी परिस्थिती पूर्वी होती. कदाचित याचं आज प्रमाण कमी झालं असेल. पण मी हे मुद्दाम सगळ्यांना सांगतो की, हे पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे. त्यांनी हे बंद केले नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून ते बंद केले पाहीजे. गणेशोत्सव हा खूप पवित्र सण आहे त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे”, अस म्हणत त्यांनी गणेशोत्सव या सणाचा मुळ उद्देश स्पष्ट केला.