अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईक हिने आजवर तिच्या अभिनयाने, नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मानसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. बरेचदा ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते. तर काहीवेळा अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील भाष्य चर्चेत आलं आहे. नव्या पिढीतील तरुणवर्ग मुलंबाळं नको या उद्देशाने आयुष्य जगतात, तर याबाबत अभिनेत्रीच नेमकं मत काय याचा खुलासा तिने ‘अमृता फिल्म’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. (Manasi Naik)
“अलीकडच्या अनेक मुली मुलंबाळं नको असं बोलतात यावर एक नव्या पिढीतील अभिनेत्री म्हणून तुझं काय मत आहे?”, असा प्रश्न अमृता यांनी मानसी नाईकला विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “अनेकदा मला वाटतं मी फार वेगळ्या काळात जन्म घेतला आहे कारण, याबाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत. मी आताच्या काळातील असली तरीही अनेक गोष्टी माझ्या ठरलेल्या आहेत. मला अशा पद्धतीने माझं आयुष्य जगायचं आहे हे मी आई-बाबांना फार आधीच सांगितलं आहे. मला वाईट याचं वाटतं की, असे निर्णय घेताना आपण कधीच आपल्या आई-वडिलांचा विचार करत नाही. खरंतर मूल होण्याचा प्रवास फक्त आपण आई-बाबा होणं यापुरता मर्यादित नसतो. याउलट आपले आई-बाबा, आजी-आजोबा होणार हा गोडवा खूप मोठा असतो. फक्त त्यांचा आनंद पाहण्यासाठी तरी मला नक्कीच आई व्हायचं आहे”.
मानसी पुढे म्हणाली, “आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. आई झाल्यावर एखादी स्त्री खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला येते. आजकालच्या काळात वय जास्त झालं की, प्रत्येक बाईपुढे विविध समस्या, प्रश्न निर्माण होतात. लग्न कधी होणार वगैरे असे सगळे प्रश्न विचारले जातात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मला मूल हवंय आणि त्याबाबतचे माझे विचार मी आई-बाबांना सांगितले आहेत. आजकालच्या काळात विज्ञान खूप पुढे गेलं आहे. आपण डॉक्टरांशी बोलून या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करु शकतो. पण, आताच्या पिढीवर सोशल मीडियाचा खूप प्रभाव आहे”.
अभिनेत्री पुढे असंही म्हणाली की, “काही जणांना गरोदरपणानंतर फिगर बदलेल याची काळजी असते, ती फिगर व्यवस्थित ठेवायची म्हणून नकार दिला जातो. काहीजण बाळाचं संगोपन करता नाही येणार असं म्हणतात, यापुढे जाऊन अनेकांना सु-शी साफ करणं घाण वाटतं. पण, माझे विचार फार वेगळे आहेत. आजी-आजोबा, सासू-सासरे, नणंद-भावजय मला ही सगळी नाती जपायला भयंकर आवडतं. मला उपजतच या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मी नात्यांना जिथे महत्त्व दिलं जातं अशा घरात जन्माला आली आहे. पैसा आज आहे, उद्या नाही. पण, नाती महत्त्वाची असतात आणि हे सगळं मला माझ्या पालकांनी शिकवलं आहे”, असं मानसी नाईकने सांगितलं.