‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा रिऍलिटी शो विशेष चर्चेत राहिला. या रिऍलिटी शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता हार्दिक जोशी याने उत्तमरित्या सांभाळली. काल या शोचा फिनाले अगदी दणक्यात पार पडला. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात आले होते. शहरात अत्यंत सुखद जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागली. गावाकडची कधीही न केलेली कामे करणे हे या शहरातल्या तरुणींसाठी हे एक मोठे आव्हानच होते. (Jau Bai Gavat Finale)
११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन व तीव्र संघर्षांनी भरलेल्या ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘रमशा फारुकी, ‘रसिक ढोबळे, ‘संस्कृती साळुंके’, ‘अंकिता मेस्त्री’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या ह्या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी, महेश मांजरेकर ही कलाकार मंडळी खास पाहुणे लाभले होते.
विजेतेपदावर नाव कोरलेल्या रमशाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, ” Oh My God ! तो क्षण जेव्हा सरानी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटत की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती.पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है”. खरच बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा.
पुढे ती म्हणाली, “मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं ‘जाऊ बाई गावात’ या शोला १०० % दिले आहेत तसच पुढे ही दयायच आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकत. ‘जाऊ बाई गावात’ आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानल आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”