मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शुभांगी गोखले. शुभांगी यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. बहुआयामी अभिनेत्री म्हणूनही त्यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या खासगी आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे. शुभांगी यांचे पती म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनानंतर काम करत त्यांनी स्वतः एकटीने कुटुंब सांभाळलं. मुलगी सखी गोखलेचा सांभाळ केला. पण दुसरं लग्न करणं त्यांनी टाळलं. शुभांगी यांनी दुसरं लग्न का केलं नाही? याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता. (Shubhangi Gokhale Life)
शुभांगी यांनी एका मुलाखतीत दुसरं लग्न का केलं नाही? याबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं. “तुम्ही दुसरं लग्न का केलं नाही?” असा प्रश्न शुभांगी यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “मोहनचे जे गुण आहेत, त्याच्याबरोबरचे जे अनुभव आहेत त्यांनी मला खूप प्रेम दिलं. त्रास त्याच्या वागण्याचा झाला असेल पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. चित्रीकरणासाठी घरातून निघायचं आहे पण तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीबरोबर काम करायचं नाही म्हणून सरळ जाणार नाही असं म्हणायचा. अशावेळी या माणसाला काय समजवायचं हा प्रश्न होता. पण तो काही माझ्याबरोबर दुष्ट नव्हता. मला खूप लोक विचारतात की लग्न का केलं नाही?. पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालेलं आहे की, त्यानंतर कणभर दुःखही मला सहन होणार नाही”.
“त्याचबरोबर त्याने इतकं सुख दिलं आहे की, त्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नाही. मी स्वतंत्र्य आहे. स्वतः सगळी कामं करते. पैसे कमावते, अभिनय करते सगळं काही माझ्याकडे आहे. मला मोहनची सवय आहे म्हणजे मला केअर टेकर हवा असतो. पण मला तो कोणामध्ये दिसला नाही. शिवाय माझ्याबरोबर सखी होती. मी ३५ वर्षांची असताना मोहनचं निधन झालं. तेव्हा माझं लग्नाचं वयही होतं. पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामध्ये तसं धाडस नाही”.
“लग्न न करण्यामागचं आणखी एक कारण होतं की, सखी ते बहुतेक आता नाही कळणार किंवा कळालंही असेल. ते कारण म्हणजे जर मी लग्न केलं असतं तर तिचं आयुष्य खूप बदललं असतं. मोहन गेला तेव्हा ती पाच वर्षांची होती. दुसरं लग्न केल्यानंतर त्या माणसाने सखीला कसं वागवलं असतं? तिला मोहनचीही नीट माहिती नव्हती. मला सखी अजूनही बोलते की, तुला जोडीदाराची गरज आहे. लग्नाचा विचार कर. पण मोहनची झलकही मला कोणामध्ये दिसली नाही. आणि आता कशासाठी लग्न करायचं?. चल आता एकत्र गोव्याला जाऊ वगैरे असं मला काही करायचं नाही. माझं सगळं जग फिरुन झालं आहे. आता लग्न करण्याचं हे वय आहे असंही मला वाटत नाही”. शुभांगी उत्तम काम करत अगदी आनंदाने त्यांचं आयुष्य जगत आहेत.