Vicky Kaushal Chhaava Movie Controversy : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात अभिनेता विक्की कौशल लेझीम खेळताना दिसून आला. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. काहींनी आक्षेप घेतला, तर यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशीही भूमिका अनेकांनी घेतली. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांसमोर आपलं मत मांडलं.
चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी ‘राज’मार्ग निवडल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. ते बदल आम्ही करणार आहोत. तसेच, ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरु आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता”.
आणखी वाचा – “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, संजय दत्तचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “देवाला…”
पुढे ते असंही म्हणाले की, “ज्या सीनवरुन वाद निर्माण झाला आहे, तो आम्ही डिलीट करणार. राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिला आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण जर कुणाला वाटत असेल, आमचे राजे असे लेझीम खेळत नसतील, तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार. कारण तो चित्रपटाचा खूप मोठा भाग नाही आहे, एक छोटासा सीन आहे. त्यामुळे तो आम्ही काढून टाकणार. आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष रिसर्च करतेय. हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की, छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावं, ती व्यक्ती काय होती, किती मोठा योद्धा होता, राजा होता हे संपूर्ण जगाला कळावं. पण एखाद, दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील, तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही”, असं दिग्दर्शक उतेकर म्हणाले.
वार्ताहरांनी उतेकर यांना प्रश्न विचारला की, “तुम्ही तुमच्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज नाचत असल्याची दृश्ये का घेतली होती?” त्यावर उतेकर म्हणाले, “हा संपूर्ण चित्रपट शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. म्हणजे, इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहे, त्यामुळे नेमकं काय करायचं, यासाठी आम्ही ‘छावा’ कादंबरीचे ऑफिशिअल राईट्स विकत घेतले. ‘छावा’ कादंबरीत लिहिलं आहे की, छत्रपती संभाजी महाराज होळीचा उत्सव साजरा करायचे, होळीतून नारळ काढून खायचे. लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. असं नाही की, त्यामध्ये कुठलेही आजचे डान्स स्टेप्स नाहीत. असं काही महाराजांचं चित्रण केलेलं नाही की, ते पाहून आपल्याला लाज वाटावी. संभाजी महाराज कधी लेझीम खेळले नसतील का? कारण ते फक्त २० वर्षांचे होते. जेव्हा महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला, ते जिंकलं त्यानंतर ते रायगडावर आले, त्यावेळी एक २० वर्षांचा राजा खेळलाही असेल लेझीम. त्यात गैर काय असं मला वाटतं नाही पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील, तर तो चित्रपटापेक्षा किंवा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे तो भाग आम्ही नक्की डिलीट करु”.