‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. आजवर या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. असंख्य प्रेक्षक या कार्यक्रमाचे वेडे आहेत. या कार्यक्रमाने, कार्यक्रमातील कलाकारांनी तसेच त्यांच्या विनोदी स्किट्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हास्यजत्रेतील कलाकारांवर तर चाहत्यांचं विशेष प्रेम आहे. हास्यजत्रेतील काही कलाकार जेव्हा हा मंच सोडून गेले तेव्हा प्रेक्षकांनी या मंचावर ते परत यावे, अशी मागणी केली. (Maharashtrachi Hasyajatra Artist)
आजही जे कलाकार हास्यजत्रेत नाहीत त्यांना प्रेक्षक मिस करत आहेत. पण हे कलाकार स्वमताने हा मंच सोडून गेले आहेत असं हास्यजत्रेच्या लेखक, दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. नुकतीच हास्यजत्रेचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा, मस्ती आणि पॉडकास्ट’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली, यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कार्यक्रम सोडून गेले. पण आमचं ते सामंजस्याचं नातं आहे. अजूनही ओंकार आणि माझं फोनवर बोलणं होतं. कधी भेटलो तर आम्ही बोलतो. पण आता असलेल्या राजकीय वातावरणामुळे लोकांना असं वाटायला लागलं आहे की, कोणीतरी कार्यक्रम सोडून गेला म्हणजे तो दुखावूनच जातो. असं काहीच नसतं. काहीतरी त्यांचीही कामं पुढे असतात.”
यापुढे बोलताना ते म्हणाले, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ इतकी लोकप्रिय आहे की, ती आता सगळ्या ठिकाणी पोहोचली आहे. साहजिकच चित्रपटातील कास्टिंग डायरेक्टरपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. कलाकारांना विविध भूमिकांसाठी विचारणा होते. त्यावेळी आमच्याकडे आठवड्याला चार दिवस एपिसोड असायचे. महिन्यातील २० दिवस चित्रीकरण असायचं. अशावेळी कलाकारांना हाती चित्रपट असला की, त्यांची द्विधा मनस्थिती निर्माण होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सारखे मंच जेव्हा तयार होतात तेव्हा मंचाची गरज आपल्याला जास्त असते. नंतर आपण लोकप्रिय झाल्यावर लोकांना आपली गरज जास्त वाटायला लागते. तेव्हा लोकच आपल्याला विविध संधी निर्माण करुन देतात. अशावेळी समोर मोठी संधी असताना मंच सोडायचा का? हा कलाकारांपुढे प्रश्न असतो. यादरम्यान कलाकार आमच्याशी बोलतात. तीन महिने येत नाही असं जर कलाकाराने म्हटलं तर आम्ही काय करणार?. एकतर शो सोडा नाहीतर थांबा. मग शो पुढे जाऊ शकत नाही. सगळ्यांनाच काम आहेत मग सगळेच म्हणतील की, मोकळ्या वेळात मी हास्यजत्रा करेन. पण मोकळ्या वेळात हास्यजत्रा करुन प्रेक्षकांना तरी आवडणार आहे का?.”
पुढे मोटे म्हणाले की, “ओंकारनेही तोच विचार केला. तो समोरुन म्हणाला होता की, सर माझ्याकडे तीन चित्रपट आहेत. मला प्रत्येक वेळी शेड्युलमधून सोडा असं तुम्हाला म्हणणं वेगळं वाटतं. मला वेगळी वागणूक मिळत आहे असंही होईल. त्यामुळे तो गेला. ओंकार अत्यंत विनम्र व्यक्ती आहे. त्याचा तब्येतीचंही एक कारण होतं. तो ‘फु बाई फु’मध्ये दिसला तेव्हा चर्चा सुरु झाली. त्याचंही कारण त्याने आम्हाला नंतर सांगितलं. तो छोटा सीझन होता म्हणून त्याने केलं. विशाखा जातानाही आमची सविस्तर चर्चा झाली. ती आम्हाला म्हणाली की, मोटे आज दहा ते बारा वर्ष मी हेच करत आहे. पंढरीनाथ कांबळेही नीट बोलूनच बाहेर पडला. आमच्याशी भांडणं होऊन कोण बाहेर पडलं असं काहीच झालं नाही.”