‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’ या हिट चित्रपटांचा दिग्दर्शक, अभिनेता म्हणजेच प्रसाद ओक. अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारून त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर वेगळीच छाप सोडली. या भूमिकेमुळे सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. सोशल मीडियावर प्रसाद-मंजिरी ही जोडी त्यांच्या ट्रेंडिंग रिल्सने चाहत्यांना भुरळच घालते. सध्या प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Prasad oak speak on maharashtrachi hasya jatra show)
अभिनेता किंवा दिग्दर्शक ही ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. ‘छापा-काटा’ या कार्यक्रमाच्या मुलाखतीत त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, ”तुम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत असताना जी प्रतिक्रिया कलाकारांना देत असता. त्या एका वाक्यामुळे लोकांचं आयुष्य बदलू शकतं. तर ती वाक्य तुम्ही ठरवून बोलता का?”.
यावर प्रसाद उत्तर देत म्हणाला, ”नाही ठरवून तर अजिबात नाही. याआधी हास्यजत्रा ही एक स्पर्धा होती पण आता स्पर्धा नाही आहे. हे सगळे उत्कृष्ट कलाकार आहेत यांची स्किट्स लोकं वेड्यासारखे बघतात. सिक्ट्स संपल्यानंतर जेव्हा मी बोलायला लागेन तेव्हा जर लोक वेळ पुढे ढकलायला लागले तर तो माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो अपमान एक कलाकार म्हणून मला सहन नाही होणार”.
“आपण पण असं बोललं पाहिजे की लोकं थांबतील फॉरवर्ड नाही करणार. एवढाच एक उद्देश आहे आणि या उद्देश ठेवूनच मी काम करत आहे”.
अभिनेता, दिग्दर्शक या भूमिका चोख बजावत असताना. पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात उत्तम मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून झळकत आहे.