Vishakha Subhedar On Ranveer Allahabadia : स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने केलेल्या आक्षेपार्ह कमेंटवरुन वाद वाढत चालला आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केले जात आहेत. सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत. ‘इंडिया गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
आजही हे प्रकरण तापलेले असताना यावर अनेक कलाकारांनी आपले मत दिलेले पाहायला मिळाले. काहींनी रणवीरला पाठिंबा दिला तर काहींनी रणवीरच्या चुकीवर सडेतोड भाष्य केले. अशातच मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी देखील रणवीर अलाहाबादीयाच्या प्रकरणावर भाष्य करत सोशल मीडियावर एक रोखठोक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी असं म्हटलं की, “वि(वेक)नोद संपला. माणसं दारु पितात. ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला, तर आपण काय म्हणतो; तो दारूवर नाही, तर दारू त्याच्यावर स्वार झाली आहे. आजच्या सो कॉल्ड तरुण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेला आहे, की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झाला आहे. त्यामुळे झालंय असं, की त्याने आपला विवेक गहाण ठेवला आहे, हेही त्याला कळत नाही. सद्सदविवेकबुध्दी नावाची काही गोष्ट असते, हे तो पूर्ण विसरून गेला आहे. झटपट प्रसिध्दीसाठी”.
आणखी वाचा – “परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका”, अनुष्काला पारूने धमकावलं, धडा शिकवायला कोणता डाव आखणार?

पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागला आहे. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं. अगदी ताजं उदाहरण म्हणजे युट्यूबवरचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी नीचतम पातळी असेल, तर रणवीर अलाहाबादीया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आई वडिलांच्या प्रायव्हसी संदर्भात प्रश्न विचारुन विनोद करणं, हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरंतर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादीयाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादीयापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं”.
“महाराष्ट्रात दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या व्दयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरुन दाद दिली. पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. चि. वि. जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही. परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादीयालाही आईवडील असतील. बहीण असेल. याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना या ना त्या प्रकारे पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडला आहे”.
शेवटी त्या रोष व्यक्त करत म्हणाल्या, “‘इंडियाज गॉट लेटेंट’ सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघण्याची गरज आहे. आता स्टॅण्डअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं”.