वैष्णवी हगवणे प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवी परपुरुषाबरोबर चॅट करत होती, त्या पुरुषाचा साखरपुडा होणार होता अशाप्रकारचे अनेक आरोप वकिलांनी केले. हगवणे यांच्यावरचे आरोप फेटाळून लावण्यासाठी हा नवा ट्वीस्ट बहुदा आणला असावा. मात्र याची आता राज्यभर चर्चा सुरु आहे. वैष्णवीच्या तर संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रणही निदर्शनास आले. मग असे आरोप करण्यामध्ये कितपत तथ्य आहे? असा सवाल वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे. कस्पटे कुटुंबियांनी आमच्या पोरीचा काहीच दोष नाही म्हणत आरोप खोडून काढले. (Vaishnavi hagawane death case)
प्रसारमाध्यमांशी बोलताना वैष्णवीचे मामा व काकांनी सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. कस्पटे कुटुंबिय म्हणाले, “आरोपी हा आरोपी असतो. गुन्हेगार कधी मी गुन्हा केला असं कबुल करणार आहे का?. आमची मुलगी गेली. पण न्यायदेवतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पोलिस त्यांचा योग्य त्या पद्धतीने तपास करत आहेत. ते जे काही आरोप करत आहेत यामध्ये काहीच तथ्य नाही. आमच्या मुलीवरती जे काही शिंतोडे उडवत आहेत त्याचा मी जाहिर निषेध करतो. मुलगी गेली हे दुःख मोठं. स्वतःला वाचवण्यासाठी तिच्यावर आरोप करणं योग्य नाही”.
“५१ तोळे सोनं, गाडी मागून घेतली. आम्ही स्वइच्छेने काहीच दिलं नाही. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची वगैरे कोणतीच गाडी नाही. एक मर्सिडीज आहे त्याच्यावरही कर्ज, लोन आहे. वैष्णवीचा मृत्यू हा १६ मेला झाला. १७ मेला सकाळी ७.३० वाजता करिश्मा हगवणेंना मी स्वतः फोन केला. तुम्हाला त्याचं कुठे रेकॉर्डिंग मिळत असेल तरीही बघा. त्यावेळी मी करिश्माला सांगितलं की, लहान मुल आहे तुम्ही त्याला वैष्णवीच्या आई व वडिलांकडे वाकडला हाती द्या. ती मला बोलली, ठिक आहे मामा आम्ही देतो. तर ती मला म्हणाली, मामा आम्हाला कोण काय करेल का?. मी म्हणालो, तुम्ही जर काय केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे?”.
“राजेंद्र हगवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हगवणे यांनी आम्हाला फोन करुन सांगितलं की, बाळ खूप रडत आहे तुम्ही त्याला आणायला माझ्या घरी या. मग आम्ही बाळ आणायला त्यांच्या घरी गेलो. त्यांनीच आम्हाला निलेश चव्हाणच्या घरी नेलं. हे लव्हमॅरेज आहे. मग यांनी लव्हमॅरेज एकतर्फी केलं का?. त्या मुलीची पहिली दोन स्थळं तुम्ही का मोडली?. तुम्ही त्यांचा पैसा बघूनच लव्हमॅरेज केलं ना… त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं. यांचं प्रेम फक्त पैशांवर होतं. त्यांना आता दुसरी कोणतीच बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्यहणन करत आहेत. लव्हमॅरेज आहे तर तुम्हाला संशय घेण्याची काय गरज आहे?. तुम्हाला एकमेकांवर विश्वास नाही का?. तिच्यावर विश्वास नव्हता तर मग लग्नच का केलं?”. आता वैष्णवी मृत्यू प्रकरणात पुढे काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.