कोणत्याही कलाकारासाठी पुरस्कार हा महत्वाचाच असतो. मात्र कोणत्याही पुरस्कराची अपेक्षा न करता प्रत्येक कलाकार काम करत असतो. या पुरस्कारांमुळे प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन मिळत असते. मात्र कधीकधी हे पुरस्कार मिळण्यात दुजाभाव केला जातो. याविषयी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी एक खुलासा केला आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीदरम्यान उषा नाईक यांनी हा खुलासा केला आहे. खरंतर पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची मिळालेली पोचपावती असते. अशातच उषा नाईक यांना नुकताच ‘व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही पुरस्कारांविषयी उषा नाईक यांनी भाष्य केले.
यावेळी उषा नाईक असं म्हणाल्या की, “‘कलावंतीन’, ‘हळदी कुंकू’, ‘सुशीला’ अशा काही चित्रपटांसाठी मला तेव्हा पुरस्कार मिळणार होता. त्यावेळी त्यागराज पेंढारकर मला म्हणाले होते की, “तुला पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही भांडत आहोत”. तेव्हा दादा कोंडकेंना त्यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटासाठी उषा चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा होता. यासाठी त्यांचं तेव्हा काही मंत्र्यांशी संगनमत चाललं होतं. माझ्यापाठी तेव्हा कुणी गॉडफादर नव्हता. परीक्षक मात्र माझ्या बाजूने होते. परीक्षकांना माझ्यावर अन्याय होऊ नये असं वाटत होतं. तेव्हा आम्ही तिला सहाय्यक म्हणून पुरस्कार देतो. यापुढेही तिला पुरस्कार मिळतीलच असं ठरलं. पण परीक्षकांनी “सहाय्यक पुरस्कार नाही, तर मग कोणताच पुरस्कार देऊ नये. तुम्हाला ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे, त्यांना द्या” असं सांगून पुरस्कार देण्यावर बहिष्कार टाकला”.
आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “तेव्हा परीक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे याच्यातून आता मार्ग काय काढायचा असं ठरलं. दादा कोंडके मात्र उषा चव्हाण यांना पुरस्कार देण्यावर ठाम होते. तेव्हा दादांचं तसं प्रस्थचं होतं. तेव्हा मग मला सहाय्यक किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार न देता विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार देण्याचं ठरलं. मग त्या वर्षापासून ‘विशेष अभिनेत्री’ हा पुरस्कार जाहीर झाला आणि तो मला व अशोक सराफ यांना मिळाला”.
दरम्यान, उषा नाईक यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयांची छाप सोडली आहे. उषा नाईक यांनी ‘दैव देते’, ‘येऊ का घरात’, ‘राखणदार’, ‘भुजंग’, ‘हळदी कुंकू’, ‘एक हजाराची नोट’, ‘सत्वपरीक्षा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.