tejaswini pandit emotional : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अडीच वर्ष सुरु असून रसिकांच्या मनावर राज्य करतेय. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. काल या मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत ज्योती चांदेकर यांनी उत्तम काम केले. ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. तर मालिकेच्या संपूर्ण टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पूर्णा आजीला विसरु शकणार नाही, त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही अशा असंख्य प्रतिक्रिया मालिकेतील कलाकारांनी देत भावना व्यक्त केल्या. मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्यानंतर हा आनंद साजरा करताना साऱ्यांना सेटवर पूर्णा आजींची उणीव भासत होती. यावेळी सेटवर पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मालिकेच्या टीमने त्यांच्या नावे सदाफुलीचे रोपटं लावत त्यांची आठवण काढली.
आणखी वाचा – सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या या व्रतामागची कथा आणि शुभ मुहूर्त
मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आज ‘ठरलं तर मग’चे ९०० भाग पुर्ण झाले. आज सेटवर केक कापून, आजीच्या नावाची सदाफुली लाऊन दिवस साजरा केला. ती हे बघायला हवी होती. पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत. तिच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या. सीन फिरवावे लागले. अजुनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय. पण तुम्ही जी साथ देताय त्याला सलाम. तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल. तोपर्यंत तुमचं प्रेम. तुमचा ‘ठरलं तर मग’ वरचा विश्वास. तुमची साथ अशीच राहुद्या.॥जय गुरुदेव दत्त॥”, अशी भावुक पोस्ट जुईने इंस्टाग्रामवर शेअर केली.

जुईची ही भावनिक पोस्ट रिशेअर करत तेजस्विनी पंडितने मालिकेच्या सर्व कलाकारांना धीर दिला आहे. “तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण, तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील- जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम”, असं तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.





