‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. या मालिकांमधील कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेच्या कथानकामुळे आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. मालिकेतील अर्जुन व सायलीच्या जोडीला तर चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. शिवाय मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. (Tharal Tar Mag New Twist)
सध्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे तो सायलीची विशेष काळजी घेताना दिसतोय. तर एकीकडे पुर्णा आजी सायलीचा राग राग करताना दिसतेय. तिला अर्जुनचं लग्न पाहता आलं नाही याचा दोष ती सायलीला देत असते. सायलीला बोलणी खावी लागल्याने अर्जुन थेट हॉलच्या मध्यभागी अग्नीकुंड ठेवतो, आणि नवरात्रौत्सवानिमित्ताने आणलेलं देवीच्या पूजेसाठीच मंगळसूत्र घेऊन लग्नाची तयारी सुरु करतो.
मालिकेच्या आजच्या भागात असे दाखवले आहे की, अर्जुन सायलीचा हात धरुन तिच्यासह पुन्हा एकदा सप्तपदी घेतो, तिच्या भांगेत कुंकू भरतो आणि तिला मंगळसूत्रही घालतो. यावेळी अर्जुनला त्यांनी देवळात नाईलाजाने केलेलं लग्नही आठवत असतं, मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो. अश्विन आणि कल्पनाही हे लग्न पाहून खूश होतात. तर पूर्णा आजी, अस्मिता, प्रिया, अर्जुनचे बाबा आणि स्वत: सायलीदेखील हे पाहून गोंधळात पडतात.
अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, नवरात्रोत्सवाची पूजा सुभेदारांच्या घरात पार पडल्यानंतर एक जोगतीण जोगवा घेऊन येते. यावेळी ती, “अर्जुन म्हणजे शूर आणि सायली म्हणजे फुलासारखी नाजूक असं जरी असलं तरीही, तुम्ही दोघं लग्नाचं खोटं नाटक करत आहात” असं सर्वांसमोर सांगताना दिसतेय. जोगतीणीने केलेलं धक्कादायक विधान ऐकून अर्जुन-सायली चांगलेच घाबरतात. तर सुभेदार कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसतो. असं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून आता अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघडकीस येणार का, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.