pandharpur wari 2025 : महाराष्ट्रातील सर्वांत मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ही केवळ यात्रा नसून ती एक अध्यात्मिक साधना आहे. पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी वारी विशेष कार्यक्रम ‘माऊली महाराष्ट्राची’ घेऊन आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकरांसह ही पंढरीची वारी प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवण्याची संधी मिळत आहे.
आदेश बांदेकरांबरोबरचे ‘स्टार प्रवाह’चे अनेक कलाकार ही या वारीत सहभागी होऊन हा अद्भूत सोहळा अनुभवत आहेत. ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग नुकतीच या वारीत सहभागी झाली. माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवेघाट ते सासवड असा कठीण टप्पा पायवारी करुन तिने वारकऱ्यांसाठी भाकऱ्या बनवल्या. स्वतःच्या हाताने तिने वारकऱ्यांसाठी भाकऱ्या बनवल्या आणि त्यांना खाऊ घातलं.
आणखी वाचा – मालिकेत अपघात, मृत्यूचा सीन शूट होताना कलाकारावर नारळ ओवाळून काढतात नजर, मराठी अभिनेत्रीने दाखवलं सत्य
या अनुभवाविषयी सांगताना शर्वरी म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली. अत्यंत भारावून टाकणारा अनुभव होता. सासवड ते दिवेघाट हा अत्यंत कठीण टप्पा आम्ही पायी सर केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येतजण भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. आजूबाजूचा हा उत्साह पाहून माझ्यातही नवी उर्जा संचारत होती. या टप्पात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. वारकरी विसाव्यासाठी जिथे थांबतात तिथे मला जाता आलं. हरीपाठ कानावर पडत होता आणि या विलक्षण सुखावणाऱ्या वातावरणात मी भाकऱ्या बनवल्या. हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण मला एक नवी अनुभूती मिळालीय हेच सांगू शकेन”, असा शब्दात शर्वरीने आपली भावना व्यक्त केली.
शर्वरी जोग सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत ईश्वरी ही भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत अर्णव व ईश्वरी यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळत आहेत. दोघांमधील नातं आता केव्हा बहरणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.





