Sankarshan Karhade Political Poem : लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत संकर्षण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तो एक उत्तम लेखक, कवी असल्याचे साऱ्यांना माहित आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नेहमीच तो विविध विषयावर कविता करताना दिसतो. अशातच अभिनेत्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका कवितेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे.
स्मृतीगंध मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कविता सादर करत संकर्षण म्हणतोय की,
“महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरुन पाहावं,
मला वाटतं पांडुरंगा, तू यंदा निवडणुकीला उभं राहावं,
मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम
तुझेच स्टार प्रचारक देवा ज्ञानबा- तुकाराम
प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील
बॅनर पाहून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील…”
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची तब्येत बिघडणार, या सगळ्याला पारू ठरणार का जबाबदार?, मोठा ट्विस्ट
“सगळं सुखाचं होईल देवा, विपरीत काहीच घडणार नाही,
आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही,
अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटेल,
आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडं देखील लवकर सुटेल,
पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील
आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील
सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे”
“कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे!,
मग काय टाप कोणाची, कोण कायदा हातात घेईल,
अरे एका नजरेत पूर्ण महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल,
लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं,
त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं,
आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील
बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं
त्या तुकोबांच्या हाती दे पुन्हा हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या
एकदम झाला आवाज हो…”
“लखलख वीज कडाडली
वीटेवरची माऊली माझ्यावरती चिडली
काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे…
हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे
या थोरांना मंत्री करून मला CM करतोय होय
राजकारणात यांच्या नावाचा होतोय तेवढा वापर पुरेय
राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाचा ऐकतोय
पण, ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीने राष्ट्रासाठी पुढे बोलू लागला
मला बोलला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता?
आणि मग कसं काय तुम्ही जयंती असताना डीजे लावून नाचता
या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत
डोक्यावरती घेतलं पण, डोक्यात नाही घातलंत.
प्रत्येक तुका-शिवाजी आहेत…”
“जर विचारांचा घेतला वसा
सुराज्यासाठीच काम करावं मग कोणीही खुर्चीत बसा!
आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड…
आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा
अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पाहा”