गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड चित्रपटांची गणितं काहीशी बदलेली दिसत आहेत. ड्रामा, कॉमेडी, एक्शन सीन्स सगळं काही पाहता चित्रपटांचं कथानकच रट्याळ असल्याच्या विविध प्रतिक्रिया समोर येतात. कित्येक कलाकारही बॉलिवूड चित्रपटांमध्ये अलिकडे काहीच रस नसल्याचं अगदी उघडपणे बोलतात. शिवाय इंडस्ट्री म्हणजे निव्वळ पैशांचा खेळ आणि व्यवसाय झाला असल्याचीही अनेकांची भावना आहे. अशातच संजय दत्तनेही आता याबाबत मोठं विधान केलं आहे. बॉलिवूडमध्ये मेहनत कमी आणि पैशांसाठी अधिकाधिक काम सुरु असल्याचं त्याचं म्हणणं आहे. फक्त पैशांकडे पाहता कामाची गुणवत्ता कमी होत असल्याचं संजयचं मत आहे. त्याने इंडस्ट्रीची खरी परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली आहे. (Sanjay dutt on bollywood)
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने अनेक विषयांवर भाष्य केलं. दाक्षिणात्य चित्रपटात तो अगदी रमला आहे. पण दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये सगळेच अगदी आवडीने आणि जिद्दीने काम करतात असं संजयचं म्हणणं आहे. मात्र बॉलिवूड हेच सगळं हरवून बसला आहे असं स्पष्ट शब्दांत संजयने सांगितलं. कामाप्रती बॉलिवूडचं असणारं वेड त्याला पुन्हा आणायचं आहे.
संजय म्हणाला, “टॉलिवूडची काम करण्याची आवड बॉलिवूडमध्ये पुन्हा आणायची माझी इच्छा आहे. बॉलिवूडने जिद्द आणि आवड गमावली आहे. ही एकच गोष्ट आहे जी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या तुलनेत आपल्या देशात कमी आहे. त्याचं मला वाईट वाटतं. एक चांगला चित्रपट बनवण्याची आवड आणि जिद्द हवी. चांगला चित्रपट म्हणजे फक्त भरपूर आकडे नाहीत. बॉलिवूडमध्ये सगळं काही पैशांसाठी आहे. पण हे सगळं पैशांसाठी करु नये. आवड आणि जिद्द म्हणून चित्रपट करावेत”.
आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, धोका टळला नाही, स्वतःच म्हणाली, “आता…”
‘द राजा साब’मध्ये संजयने प्रभासबरोबर काम करणार आहे. याचबाबत त्याने सांगितलं की, “तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की, मी तेलुगू भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी प्रभासबरोबर आणखी एक चित्रपट करत आहे. द राजा साब नावाचा चित्रपट मी करत आहे. प्रभास मला खायलाही खूप देतो. सगळ्यात चांगल्या व्यक्तींपैकी एक प्रभास आहे. तसेच तो सर्वोत्तम अभिनेताही आहे”. संजयने प्रभासचं अगदी भरभरुन कौतुक केलं.





