‘सैराट’मधील आर्ची व परश्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मात्र या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या. त्यातलीच एक प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे परश्याचा मित्र लंगड्या. लंगड्या फेम तानाजी गालगुंडेने आपल्या अनोख्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सैराट’मध्ये “परशा आर्ची आली रे आली” असं म्हणणाऱ्या तानाजीने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सैराट’ हा गावच्या जातीव्यवस्थेवर व जातीव्यवस्थेमधील लग्नसंस्थावर भाष्य करणारा चित्रपट होता. त्यामुळे ‘सैराट’ चित्रपटाचा तानाजीच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला.
‘सैराट’नंतर त्याच्या विचारांमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठा बदल झाला. तसेच यामुळे त्याचे पुरुषी विचार बदलले असल्याचे तानाजीने सांगितले. या चित्रपटामुळे तानाजीच्या आयुष्यात काय फरक पडला? त्याच्या पुरुषी विचारांमध्ये नक्की काय बदल झाले? त्याच्या घरातच कशी पुरुषी मासिकता होती? याबद्दल त्याने नुकत्याच ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी तानाजीने त्याच्या सख्ख्या भावाच्या बायकोचा एक किस्सा सांगितला आहे.
याबद्दल बोलताना तानाजीने असं म्हटलं की, “माझा भाऊ खूप दारू पितो. म्हणजे तो अगदी पठडीतला दारुडा आहे. त्याच्या लग्नाच्या आधीपासूनच तो दारुच्या आहारी गेला होता आणि तेव्हाच मी माझ्या आईला त्याचे लग्न लावून कोणत्याही मुलीचे वाटोळे करु नको असं सांगितलं होतं. त्याची पहिली बायको वारली होती. त्यामुळे तो खूप व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे त्याला कुणी मुलगी देत नव्हतं. पण लग्न लावल्यामुळे तो सुधारेल म्हणून माझी आई त्याच्यासाठी मुलगी शोधत होती. पण आईने काहीतरी करून एका मुलीच्या घरच्यांना पटवलं आणि तिने भावाचे दुसरे लग्न लावून दिले”.
यापुढे तो असं म्हणाला की, “लग्न झाल्यानंतर माझा भाऊ नीट वागत होता. पण दोन-तीन महिन्यांनी तो पुन्हा दारू पिऊन घरी येऊ लागला. त्याचं हे दारु पिणं इतकं वाढलं की, तो त्याच्या पत्नीला मारहाण करु लागला. भाऊ दारु पिऊन घरी आला की, माझी आई आणि त्याची बायको लपून बसायची. मग तो जेवून वगैरे झोपला की, या दोघी घरात यायच्या. यावर मी त्यांना या सर्वाला विरोध करा, सहन करु नका असं म्हटलं होतं. पण तो सुधरेल या आशेने आई मला गप्प राहायला सांगायची. पण त्याच्यात काही बदलच होईना”.
यापुढे तानाजीने याबद्दल असं म्हटलं की, “एके दिवशी मी पुण्यावरुन घरी गेलो होतो. तेव्हा जेवताना त्याने त्याच्या बायकोला काही कारणावरून कानाखाली मारली आणि हे बघून माझंही डोकं फिरलं. मला ते सहन झालं नाही म्हणून मी पण उठलो आणि तो माझ्यापेक्षा मोठा असूनही मी त्याला कानाखाली मारली. यावरून आमच्यात खूप भांडण झालं. तेव्हा मी वाहिनीला माहेरी जायला सांगितलं. त्यांना एक लहान मुलगाही आहे. त्यानंतर वहिनीचं आणि माझं फोनवर संपर्क होत असे. तेव्हा एकदा त्यांनी मला काहीतरी करायचं आहे असं विचारलं. यावर मी त्यांना पुण्याला यायचा सल्ला दिला. त्यानंतर त्या पुण्यात आल्या आणि काम करु लागल्या. सध्या त्या मदतनीस म्हणून काम करत आहेत आणि अगदी सेट झाल्या आहेत. त्या स्वत: आता त्यांच्या मुलाचा सांभाळ करत आहेत”.