छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यकमातून सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. या कार्यक्रमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, तर कधी पोस्टमन काका बनून प्रेक्षकांच्या डोळ्यातून खळकन पाणीही आणले आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागरने त्याच्या खास शैलीत सादर करत एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम अचूक केलं. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे घराघरांत लोकप्रिय झाला.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांचं हृदयस्पर्शी पत्रवाचनही प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरलं. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता आजारपणामुळे टीव्ही विश्वापासून दूर होता. यानंतर त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधूनही एक्झिट घेतली. पण अभिनेता सध्या रंगभूमीवर चांगलाच कार्यरत आहे. सागर सध्या रंगभूमीवरील त्याच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.
सागरच्या हीच तर ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाला प्रेक्षकांडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही व्यंग असते. अशातच त्या कुटुंबांमध्ये एक लव्ह स्टोरी सुरू होते. पुढे त्या लव्ह स्टोरीचं काय होतं? आणि ते घडताना काय धमाल उडते? अशी या नाटकाची कथा आहे. या नाटकात सागर कारंडेसह शलाका पवार, रमेश वाणी, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन व सायली देशमुख आदी कलाकार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतल्यानंतर सागर नुकताच ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये दिसला होता.
दरम्यान, सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता व लेखक आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून तो घराघरांत पोहोचला. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. सागरने छोटा पडदा गाजवण्याबरोबरच चित्रपटांमधूनही काम केलं आहे. ‘जलसा’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘बायोस्कोप’, ‘माय हिंदू फ्रेंड’ आणि ‘एक तारा’ या चित्रपटांत सागरने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.