अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून देशातील जनता या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, या खास कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे आगमनही सुरु झाले आहे. (Sunil Lahri On Ayodhya)
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल व सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी अयोध्या शहरात पोहोचले होते. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रिय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
लक्ष्मणची भूमिका साकारलेल्या सुनील लहरी यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येतील अडचणींबद्दल सांगितले. सुनील लहरी म्हणाले, “अयोध्येकडे पाहून विश्वास बसत नाही की हे तेच शहर आहे जिथे आम्ही दोन वर्षांपूर्वी शूटिंगसाठी आलो होतो. इथे बरेच काही बदलले आहे. विशेषत: येथील वाऱ्यातही तुम्हाला ऊर्जा जाणवू शकते. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, घरे या सर्वांमध्ये भक्तीमय वातावरण आहे. शहर अतिशय स्वच्छ झाले आहे” असंही ते म्हणाले.
अयोध्येचे कौतुक केल्यानंतर सुनील अडचण सांगत म्हणाले, “येथील एक समस्या म्हणजे हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाही आहे. इथली सर्व हॉटेल्स बुक केलेली आहेत. कुठेही रुम्स रिकाम्या नाहीत. त्यामुळे रुम उपलब्ध नसेल तर दर्शन कसे घ्यावे हेच कळत नाही. माझी फ्लाईट कन्फर्म झाली आहे, पण आता मी रुमबद्दल विचार करतोय की श्रीरामांनी मला तिथे बोलावले आहे म्हणजे नक्कीच रुमचीही व्यवस्था होईल” असंही ते म्हणाले.