मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतून तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेत त्या सिंधुताईंच्या आजी पार्वती साठेंची भूमिका करताना दिसत आहेत. सध्या मालिकेच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार मालिकेच्या शूटबरोबर प्रमोशनमध्येही व्यस्त असून त्यानिमित्ताने अभिनेत्री प्रिया बेर्डे व बालकलाकार अनन्या टेकवडे हिने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्रम्हणे’ पॉडकास्टला हजेरी लावली होती. (Priya Berde)
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे व त्यांच्या मुलांना अनेक अनुभवांना सामोरे जावं लागलं होतं. सौमित्र पोटेंच्या पॉडकास्टमध्ये मुलांना चित्रपटसृष्टीत आलेल्या या धक्कादायक अनुभवाचा खुलासा करताना त्या भावनिक झाल्या होत्या. सौमित्र पोटे यांनी ‘वडील गेल्यानंतर तुमची दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत आली. चांगलं काम करत आहे. त्यांना तुम्ही काय मंत्र दिलाय ?’ असे विचारले असता प्रिया बेर्डे म्हणाल्या, “मी त्यांना एवढंच सांगितलं की, जे तुमच्यामागे नाव लागलंय, त्या नावाचं महत्त्व लक्षात ठेवा. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आणि मुलगी आहे म्हणून दोन-तीन चित्रपट मिळतील. पण पुढे तुम्हाला त्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीत स्टार किड्स वगैरे असं काही नसतं, असं मला वाटतं.”
पाहा मुलांबद्दल प्रिया बेर्डे काय म्हणाल्या ?
पुढे मुलांना आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, “चित्रपटसृष्टीत आल्यानंतर अभिनय, स्वानंदीला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. ट्रेमध्ये सजवून वगैरे त्यांना काही मिळालं नाही. त्यात लक्ष्याचा मुलगा त्याला चित्रपट मिळणारच, असे लोकांचे टोमणेही त्याला ऐकावे लागत आहेत. मी नाव सांगू शकत नाही, पण चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या लोकांकडून त्यांना खूप वाईट वागणूक दिली गेलेली आहे. पण, शेवटी ते अनुभव असतात. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही अनुभवाने मोठे होणार आहात. ते तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन नाही मिळणार.”
हे देखील वाचा – “तो दिवस, ती रात्र माझ्यासाठी…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत बोलल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “आर्थिक, मानसिक…”
‘ज्या लक्ष्मीकांतवर आपण इतकं प्रेम करतो, त्यांच्या मुलाला आपल्या इंडस्ट्रीत असे अनुभव येऊ शकतात?’ असे सौमित्र पोटेंनी विचारताच त्यावर प्रिया म्हणाल्या, “येऊ शकतात ना. कारण, त्यांचा बाप जिवंत नाही ना. ते असते, तर गोष्ट वेगळी असती. म्हणून म्हटलं की, हा संघर्ष फार विचित्र आणि वेगळं आहे. लोकांच्या मनात लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी प्रेम असतं किंवा त्यांना वाटतं की, हे लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आणि मुलगी आहे. पण, तसं काहीच नाही. इथे माझ्या मुलांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. परकोटीचे मान-अपमान सहन करावे लागले. आमचं घर अक्षरशः महिना-महिना डिस्टर्ब राहिलं आहे. पण, आम्ही कोणाला हे सांगू शकत नाही. कारण आमची जेवढी नावं मोठी आहेत, तेवढी त्यांची नावंही मोठी आहेत. आम्ही इंडस्ट्रीत टिकू की नाही, पाच वर्षं तुम्हाला काम मिळणार नाही, अशा प्रकारची वक्तव्यं केली गेली आहेत. अर्थात, आता ते लोक नंतर पाच वर्षं कुठे दिसले नाहीत हा मुद्दा वेगळा आहे.”
हे देखील वाचा – ‘मला ट्रोल करा, बेर्डे साहेबांना बोलण्याचा काय अधिकार आहे तुमचा’ म्हणत प्रिया बेर्डे संतापल्या
“पण मला असं वाटलं, तुम्ही कलाकार म्हणून किती चांगले आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून किती मोठे आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही अभिनय आणि अनुभव शिकाल. मी हेच अभिनयला सांगितलं, की तुझा अभिनय एकेक वर्षानं विकसित होईल. तो चार-पाच वर्षांनी आणखी प्रगल्भ होत जाशील. पण माणूस म्हणून तुला आताच सगळं शिकावं लागेल. आता ज्या लोकांनी तुला त्रास दिला, त्यांच्याबद्दल डोक्यात राग ठेवू नको. ते लोक परत तुझ्या आयुष्यात चांगली म्हणून येणारच आहेत. त्यामुळेच आपण माणूस म्हणून छान राहणं, विनम्र राहणं महत्त्वाचं आहे,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या. (priya berde shares a bad experience on her children after laxmikant berde death)