‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, अखेर पारू आदित्यबरोबर ऍड शूटसाठीच्या लग्नाला तयार होते. सुरुवातीला पारुच्या मनात खूप धाकधूक सुरु असते मात्र ती भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. कालांतराने आदित्य पारुला विश्वास देतो आणि त्यानंतर पारू ते लग्न एन्जॉय करताना दिसते. अगदी पारंपरिक पद्धतीने आणि मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडताना मालिकेत पाहायला मिळत आहे. प्रत्येक विधी हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं पार पडताना मालिकेत पाहायला मिळत आहे. सावित्री आत्याने जशी पारूला खऱ्या लग्नाची गोष्ट नेमकी काय असते, खरं लग्न कसं होतं हे सांगितलेलं असतं त्यानुसारच हे लग्न घडत असतं. त्यामुळे पारुला असं वाटतं की, हेच माझं खरं लग्न आहे.तर इकडे मारुती पारूचं सगळं काही नीट व्हावं म्हणून गावाकडे देवीची ओटी भरण्यासाठी आलेला असतो तेव्हा तो पारूची पत्रिका गावातल्या पुजाऱ्याला दाखवतो. तेव्हा गावातला पुजारी सांगतो की, तुझ्या मुलीचं भवितव्य हे खूप उज्ज्वल आहे आणि तू जसं सांगत आहे की तिचं लग्न ठरलं तर असं नाही आहे. तिचं लग्न पत्रिकेप्रमाणे आजच होणार असल्याचं मला दिसतं आहे. तू नक्की तुझ्या मुलीचीच पत्रिका आणली आहेस ना?, यावर मारुती हो असं सांगतो. (Paaru Serial Update)
त्यानंतर इकडे आदित्य पारुला हार घालतो मात्र पारुला आदित्यला हार घालायची वेळ येते तेव्हा पारू आदित्यकडे एकटक बघत राहते तेव्हा सगळ्यांनाच थोडावेळ भीती वाटते की, आता हे ऍडशूट बिघडणार तर नाही ना?, त्यानंतर आदित्य स्वतःच पारुसमोर गुडघ्यावर बसतो आणि त्यानंतर पारूचं लक्ष विचलित होत आणि ती आदित्यच्या गळ्यात हार घालते. मंगल विधी सुरू असताना मंगळसूत्रही घातलं जातं त्यानंतर सावित्री आत्याने जसं सांगितले तसे सात फेरे ही या लग्नात आदित्य व पारू घेताना दिसतात. संपूर्ण लग्न पार पडल्यानंतर डिरेक्टर कट असे म्हणतो आणि त्यानंतर पूर्ण चित्रच बदलतं. सगळेजण आपापल्या कामाला लागतात तर पारू तिथेच उभी राहून डोळ्यात पाणी आणून हे माझं खरं लग्न होतं असा विचार करत राहते. त्यानंतर पारू देखील मेकअप रूम मध्ये जाते तर तिकडे ती मंगळसूत्र घालूनच राहते. त्यावेळेला प्रीतम तिथे येतो आणि म्हणतो चल आपल्याला निघायचंय. दादा आणि काकू तिकडे वाट बघत आहेत.
यावर प्रीतम पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहतो आणि म्हणतो की, मंगळसूत्र काढायला विसरलीस का?, काढून ठेव. त्यावर पारू म्हणते की, नाही माझं लग्न झालं आहे. मी हे मंगळसूत्र मरेपर्यंत काढणार नाही. तेव्हा प्रीतम समोर खूप मोठा पेच निर्माण होतो. प्रीतम सांगतो, हे काही खरं लग्न नाही आहे. त्यानंतर इकडे मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी आणि आदित्य तिथे येतात तेव्हा दामिनी म्हणते की, हे मंगळसूत्र काढून ठेव मात्र पारू काही ऐकत नाही. माझा जीव गेला तरीही मी माझं मंगळसूत्र काढणार नाही, माझं लग्न झालं आहे असं सांगते. हे ऐकल्यावर दामिनी तिला खडसावते आणि म्हणते की, मारुती आणि तुझा हा प्लॅन होता हे मला आधीपासूनच माहीत होतं तुला काही झालं तरी हे मंगळसूत्र काढावंच लागेल.
तर पारू आदित्यलाही म्हणते की, माझं तुमच्याबरोबर लग्न झालं आहे. मी हे मंगळसूत्र काढणार नाही. यावर आदित्य ही चकित होऊन तिच्याकडे बघू लागतो. आता मालिकेच्या पुढील भागात दामिनी आणि सगळेजण पारूला मंगळसूत्र काढायला लावणार का?, की पारू बरोबरचं हे लग्न आदित्य स्वीकारणार?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.