‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू देवाच्या पाया पडते तितक्यातच तिथे सावित्री आत्या आलेल्या असतात. सावित्री आत्या पारूला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र पारू स्वतःचं दुःख सांगत सांगते की तुम्ही तरी माझ्याशी नीट बोला. माझ्याकडे तुमच्याशिवाय मन व्यक्त करायला, मन मोकळं करायला कोणीच नाही आहे यावर सावित्री आत्या पारूची बाजू समजून घेतले आणि त्या पारुला म्हणतात की, कोणी कितीही तुझ्यावर आरोप केले, तुला कितीही दोष दिला तरी मी तुझ्याबरोबर कायम शेवटपर्यंत असेल असा विश्वास दाखवतात.त्यानंतर त्या दोघी किर्लोस्कर बंगल्यात येतात. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर आलेले असतात. अहिल्यादेवी चहा पीत असतात तितक्यात तिथे आदित्य येतो मात्र त्या आदित्यशी काहीच बोलत नाहीत तर बाहेरून दामिनी मला आत घ्या. मी रात्रीपासून बाहेरच आहे असं सारखं ओरडत असते. यावर मोहन तिला चांगली अद्दल घडवायला जात असतो मात्र श्रीकांत त्यांना थांबवतो आणि सांगतो की, घरची लक्ष्मी आहे ती तिला घराबाहेर असं ताटकळत ठेवणं बरं नाही, असं म्हणत तिला घरात बोलावून घेतो. (Paaru Serial Update)
त्यानंतर दामिनी घरात येते आणि थेट येऊन डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करु लागते आणि बोलते मला खूप भूक लागली आहे. मी कालपासून काहीच खाल्लं नाही आणि असं म्हणून ती फटाफट खाऊ लागते. तर इकडे पारू शिरा घेऊन येते. शिरा पाहून श्रीकांत म्हणतात, अरे वा गोडाचा शिरा केला आहेस का?, आदित्य आणि अहिल्याला प्रचंड आवडतो. तेव्हा अहिल्यादेवी उठतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवरुन निघून जातात. तर दामिनी तिथे नाश्ता करतच बसलेली असते ती पारूला शिराही वाढायला सांगते. त्यानंतर पारू जेवण घेऊन अहिल्यादेवींच्या खोलीत जाते मात्र अहिल्या देवी भूक नसल्याचं सांगत तिला परत जायला सांगतो.
पारू परत जात असतानाच अहिल्यादेवी पारुला थांबवतात आणि सांगतात की, आदित्यने माझी तर फसवणूक केलीच आहे पण त्याने तुझीसुद्धा फसवणूक केली आहे. मी तुला चांगलं ओळखते. तू कोणत्या कुटुंबातून आली आहेस, तुझ्यावर कोणते संस्कार झाले आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. नशीब की या ऍड शूटच्या लग्नानं तुझ्या आयुष्यात कोणतं वादळ आलं नाही ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुला हे लग्न जाहिरातीतलं लग्न आहे हे मान्य होतं हे एक चांगलं झालं. तुला या लग्नाचा खरंच त्रास झाला नाही आहे ना? असा प्रश्न अहिल्यादेवी पारुला विचारतात. हा प्रश्न विचारून अहिल्यादेवींनी पारूला धर्म संकटातच टाकलेलं असतं. आता पारू यावर विचार करू लागते की, मी आता खरं उत्तर देऊ की खोटं उत्तर देऊ, पण खरं उत्तर दिलं तर अहिल्यादेवी आदित्य सरांचं तोंडही पाहणार नाहीत. आधीच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, ते एकमेकांशी बोलत नाही आहेत त्यामुळे मला खरं उत्तर देऊन चालणार नाही, असं म्हणून ती खोटं उत्तर देते की, हो हे सर्व काही मला माहित होतं आणि हे जाहिरातीतले लग्न आहे याची कल्पना आदित्य सरांनी दिली होती. मात्र यात आदित्य सरांची काही चूक नाही आहे, ही परिस्थितीच तशी होती यावर अहिल्यादेवी सांगतात की, ते काही असलं तरी मी त्याला कधीच माफ करणार नाही आणि असं म्हणून पारूला जायला सांगतात.
तर इकडे आदित्य बॉक्सिंग करत सगळा राग काढत असतो तेव्हा दिशा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र तो दिशाला मला थोडा एकांत हवा आहे असं म्हणत तिला जायला सांगतो. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, मारुती, हरीश, सावित्री, पारू मिळून एक प्लॅन करतात घरातले हे वातावरण पुन्हा खेळीमेळीचं होण्यासाठी मारुती हरीश व पारूचं केळवण करायचं ठरवतो. आता मालिकेत पुढे काय होणार आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.