‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, पारू ही आदित्यची सुरक्षा कवच आहे हे सत्य अहिल्यादेवी व श्रीकांतसमोर आलेले असतं. गुरुजींनी भाकीत केल्याप्रमाणे आदित्यच्या अवतीभवती कायम असणारी एक व्यक्ती आहे जी त्याचे सुरक्षा कवच आहे. यानुसार श्रीकांत अहिल्यादेवीसमोर पारू हीच त्यांच्या सुरक्षा कवच आहे, असं सांगतो. (Paaru Serial Promo)
पारूने याआधी कित्येकदा आपल्याला संकटावेळी मदत केली असल्याचेही श्रीकांत सांगतो आणि या संकेतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे असेही तो म्हणतो. यावर अहिल्यादेवी श्रीकांतवर विश्वास ठेवतात. त्यानंतर अहिल्यादेवी व श्रीकांत या संकटांवर उपाय म्हणून कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं ठरवतात. त्यावेळेला आदित्यच्या पायाला दुखापत झाली असल्याने अहिल्यादेवींना मात्र त्याला एकट सोडून जाण्याचं टेन्शन येतं मात्र श्रीकांत ही जबाबदारी पारूवर सोपवण्यास सांगतो. त्यानुसार अहिल्यादेवी पारूवर आदित्यची जबाबदारी सोपवतात आणि तिला विचारतात की, आम्ही जाऊन कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन येईपर्यंत तू आदित्यची काळजी घेशील का?, यावर पारू होकार देते.
अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी घरात नाहीत ही संधी साधत दामिनी अहिल्यादेवीसारखा वेश करुन अहिल्यादेवी म्हणून घरात वावर करत असते आणि तिच्याबरोबर दिशासुद्धा असते. दामिनीचा हा अवतार पाहून साऱ्यांनाच अचंबित केलं आहे. दामिनी अहिल्यादेवींच्या अवतारात असताना ती गनीला त्याच्या पाठीवर खूप फटके मारत असते आणि त्याला विचारत असते की, पारू आदित्यला कुठे घेऊन गेली आहे ते आम्हाला सांग. सतत पट्टीने मारत असल्याने गनी खूप रडत असतो. आणि तो बोलतो पारू कुठे गेली आहे हे मला माहीत नाही.
तर इकडे पारू आदित्यला घेऊन घराबाहेर पडलेली असते. पारू व आदित्य रस्त्यावर फिरत असतात. आदित्य रोजच्या कामात व्यस्त असल्याने तो कधीच बाहेर पडत नाही. त्यामुळे पहिल्यांदा बाहेर पडल्याने आदित्यलाही वेगळं वाटत असतं. आता पारू आदित्यला नेमकी कुठे घेऊन गेली असेल?, दामिनीकडून गनीला बसलेला मार त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.