अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॉडेलिंग केले. विशेष नामांकित कंपन्यांमध्ये मॉडेल म्हणून जाहिरात केल्या. त्यानंतर मालिका, चित्रपटसृष्टीत त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला. ‘कुरुक्षेत्र’सारख्या लोकप्रिय मालिकेत काम केल्यानंतर ‘फरेब’, ‘द्रोहकाल’, ‘विरासत’ अशा विविध मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता व खलनायक म्हणून काम केले. हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर साऊथ इंडियन व इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. मिलिंद गुणाजी यांना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र मिलिंद यांची अमिताभ यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याची संधी हुकली. यादरम्यान, मिलिंद यांनी अमिताभ यांच्यासह काम करण्यास नकार दिला असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा किस्सा मिलिंद यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे. (Milind Gunaji Incident)
मिलिंद म्हणाले, “माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा मी ‘विरासत’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. तेव्हा सगळे मोठे चित्रपट सुरू होते. ‘मृत्यूदाता’ नावाचा चित्रपट साइन केला होता. त्यात मी मुख्य खलनायक करत होतो अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध. त्याच वेळेला ‘विरासत’च्या सेटवर अपघात झाला काहीतरी आणि सगळ्या डेट बदलल्या. मी ज्या डेट ‘मृत्यूदाता’साठी दिलेल्या त्या आणि या चित्रपटाच्या डेट क्लॅश व्हायला लागल्या. मला जाणवलं की आपण हा चित्रपट नाही करू शकत. उगीच कुणाला खोट्या आशेला का ठेवायचं. मी मेहुल कुमार यांना स्पष्ट सांगितलं की असं असं आहे. मी इथे अटकलोय कदाचित मी नाही करू शकणार हे. तो म्हणाला ठीक आहे. मी त्यांना बोललो पण की एवढी मोठी संधी आहे. अमिताभ यांच्या विरुद्ध काम करायला मिळत होतं. मला वाईटही वाटतंय. काय करू पण”, असं ते म्हणाले.
मिलिंद पुढे म्हणाले, ‘त्यानंतर मग काही दिवसांनी टिपिकल हिंदी आणि इंग्लिश मॅगझीनमध्ये छापून यायला लागलं की ‘मिलिंद गुणाजी जैसे नये कलाकार का अमिताभ के साथ काम करने को इन्कार.’ मी म्हटलं हे काय लफडं आहे. मी तर असं काहीच केलं नाही. मी काही त्यांच्यासोबत काम करायला नकार दिलेला नाही. मी उगीच त्यांच्या वाकड्यात का शिरू. मी म्हटलं हे प्रकरण सोडवणं गरजेचं आहे. मग मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की जरा अमिताभ यांची अपॉइंटमेंट मिळतेय का बघा. त्यांनी अमिताभ यांच्या सेक्रेटरीला फोन केला. त्याने सांगितलं ते इथे इथे शूटला आहेत. तिथे जाऊन भेटा. मी गेलो”, असं ते म्हणाले.
यापुढे अमिताभ यांना भेटल्यानंतरचा किस्सा सांगत ते म्हणाले, “तिथे अमिताभ आपला शॉट देऊन व्हॅनिटीमध्ये जात होते. मला पाहून ते थांबले. मी त्यांना सांगितलं असं काही नाही आहे. ते म्हणाले, ‘अरे तू टेन्शन घेऊ नको. आम्हाला माहीत असतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. हे मॅगझीनकडे वगैरे लक्ष द्यायचं नाही. तेव्हा कुठे मी जरा निर्धास्त झालो”.