Dashavtar Marathi movie teaser : मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे. प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टिझरमधून लक्षात येत आहे. येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत, ‘ओशन फिल्म कंपनी’ आणि ‘ओशन आर्ट हाऊस ‘निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले असून दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टिजरमध्ये दिसून आली आहे. येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार ‘ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. प्रत्येक पात्राची झलक दाखवणारा हा टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणणारा आहे. कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे.
चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, “‘दशावतार’ ही कोकणातील मातीशी घट्ट जुळलेली पण जगभरातल्या प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. त्यातली भव्यता, थरारक प्रसंग आणि भावनिक क्षण हे प्रेक्षकांना आजवर न पाहिलेला अनुभव देतील अशी खात्री आहे. हा अनुभव घ्यायला चित्रपटगृहातच यावं लागेल अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे!”. चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे म्हणतात, “या चित्रपटाच्या भव्यतेची झलक टीझरमध्येच दिसून येते. यात प्रेक्षकांना सिनेमॅटिकली काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार आहे. अनुभवी कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपट अधिक उठून दिसतो.”
आणखी वाचा – रुबीना दिलैकच्या वडिलांचा अपघात, सफरचंद विकून परतताना दुर्घटना, पाठीमागून कारला धडक दिली आणि…
या चित्रपटाबाबत झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “बदलत्या काळानुसार मराठी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अभिरुचीसुद्धा बदलत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दर्जा सोबतच नाविन्याची जोड असणाऱ्या कथांना प्राधान्य देण्याचे काम झी स्टुडिओज करत आहे. प्रेक्षकांना आपल्या मातीतील गोष्ट अतिशय वेगळ्या ढंगाने सांगणारा हा चित्रपट असून या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सिने सृष्टीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास झी स्टुडिओच्या टीमला आहे.”





