‘अबीर गुलाल’ या नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेतून अभिनेत्री मिताली जगताप प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘वादळवाट’, ‘एक धागा सुखाचा’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करणाऱ्या मिताली जगताप मधल्या काळात दिसेनाश्या झाल्या. त्यानंतर ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मिताली पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा मालिकाविश्वातून काढता पाय घेतला. आता त्याच जोमाने अभिनेत्री पुन्हा सिनेसृष्टीत कार्यरत झाली आहे. (Mitalee Jagtap Incident)
नुकतीच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी या मधल्या काळाबाबत बरंच भाष्य केलं. मिताली जगताप यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, “खूप कालावधीनंतर तुम्ही सिनेविश्वात कमबॅक केलं आहे. या मधल्या काळात चित्रपट/ मालिकांसाठी विचारणा झाली नाही का?”. याचं उत्तर देताना मिताली यांनी हुकलेल्या संधीची खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “२०१२ पासून माझ्या मनात एक गोष्ट आहे आता ती बोलू की नको असं मला वाटतं आहे. एक सुंदर अशी कलाकृती होती.
त्या म्हणाल्या, “दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ती कलाकृती होती. त्यामध्ये मी काही वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. अगदीच उद्या चित्रीकरण आहे आणि आदल्या रात्री मी नाही येऊ शकत असं सांगितलं. कारण माझी मुलगी आजारी होती. जर ती एक कलाकृती मी केली असती तर माझ्या आयुष्यात खूप काही झालं असतं. आताची पिढी ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे. मी संभाजी नगरसारख्या शहरातून मुंबईत एकटी आले. खूप कष्ट करुन मी स्वतः स्थान निर्माण केलं. लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक सोनेरी काळ आला. तो म्हणजे मी आई झाले. एक कलाकार म्हणून मी या गोष्टीला भारावून जायला नको होतं जे मी गेले. माझ्यासाठी माझी लेक पहिलं प्राधान्य आहे. ज्यावेळी असं वाटलं की त्या छोट्याश्या जीवाला माझी गरज आहे तेव्हा मी कसलाच विचार केला नाही”.
पुढे त्या म्हणाल्या, “माझा नवराही याच क्षेत्रात आहे. आम्हीच सकाळी ७ ला घर सोडलं तर रात्री ११ ला घरी येणार. त्यामुळे माझं इतकंच म्हणणं होतं की, आम्हा दोघांपैकी एकाचा चेहरा तरी तिला दिसावा. अशावेळी मी नवऱ्याला म्हटलं की तू कर मी ब्रेक घेते. ज्यावेळी तिला माझी गरज पडली तेव्हा मी तिच्याबरोबर होते त्यामुळे करिअरमधील एक संधी मला सोडावी लागली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अशावेळी बरंच काही शिकायला मिळतं. परिस्थिती हाताळायला शिकता”.