मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेचसे चित्रपट आहेत ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. अशा हिट चित्रपटांमागे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो तो दिग्दर्शक. मराठीतील चित्रपटांपैकी असे चित्रपट जे प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत ते म्हणजे दिग्दर्शक रवि जाधव यांचा ‘नटरंग’ चित्रपट. हा चित्रपट बनला, त्याची गाणी ही हिट ठरली आणि पुढे तो चित्रपटही बराच गाजला. पण ही सगळी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरची कथा आहे.पण त्याअगोदर रवि जाधवांनी हा चित्रपट बनवण्यासाठी किती कष्ट घेतले किंवा हा चित्रपट कसा साकार झाला याबाबत नुकतंच रवि जाधव यांच्या भावाने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मैत्री स्पेशल भागात सांगितलं. त्यावेळी रवि जाधव यांनी टाईमपास चित्रपटाबद्दलही खुलासा केला. (ravi jadhav share experience about their movie)
रवि जाधव यांना ‘नटरंग’ चित्रपटाची कल्पना नेमकी कशी सुचली हे सांगताना त्यांचे मोठे भाऊ म्हणाले, “‘नटरंग’ नावाची कादंबरी वाचताना रविला वाटलं की यावर आपण चित्रपटच बनवूया. रविने घरी येऊन बाबांना सांगितलं की उद्यापासून मी नोकरी सोडतो. बाबांनी कारण विचारलं तर बोलला मला चित्रपट बनवायचा आहे. बाबांनी समजवायचा प्रयत्न केला पण तो ऐकला नाही आणि लाख रुपयांची नोकरी सोडून त्याने शुटिंगला सुरुवात केली. शुटिंगच्या पहिल्या दिवसापासून बऱ्याच अडचणी आल्या. जसे कपडे आणले ते लोक पळवून घेऊन जात होते. चपला आणल्या त्या पळवून नेल्या. तरीही पण त्याने हार नाही मानली. चित्रपट पूर्ण केला”.
या आठवणींवर बोलताना रवि म्हणाले, “मला एवढं आठवतं की, ‘नटरंग’ चित्रपटाची गाणी चालायला लागली तेव्हा मला पहिली प्रतिक्रिया राजूकडून आली. कारण कॉलेजला जाणारी मुलं रिक्षामध्ये गाणी ऐकायची तेव्हा तो सांगयचा की तुझं गाणं खूप चांगलं आहे लोक पुन्हा पुन्हा ऐकतात”.
‘टाईमपास’ चित्रपटाबद्दल बोलताना रवि सांगतात, “मला बरेच लोक म्हणतात की ‘टाईमपास’मधली रिक्षा कुठून आली, अप्पा कुठून आले? तर अप्पा म्हणजे माझे बाबा व रिक्षा म्हणजे माझ्या भावाची रिक्षा. तो पेपर टाकणारा दगडू म्हणजे मी आणि ती मेघना. बाबा त्या वेळेला मारायचे तो पट्टाही आमच्या घरचाच”, असं सांगत रविंनी आपल्या नटरंग व टाईमपास या चित्रपटातील त्यांच्या आठवणी सांगितल्या.