‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच ही प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. मालिकेत रमा व अक्षय या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. तर मालिकेत जान्हवी ही भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळेने साकारली आहे. मात्र स्मिताबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. स्मिताने जान्हवी या भूमिकेला रामराम केला आहे. (Smita Shewale Exit From Serial)
स्मिताने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला असून याबाबतची माहिती तिने तिच्या युट्युब चॅनेलवरुन दिली आहे. सेटवरील शेवटच्या दिवसातील काही क्षण तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहेत. आता यापुढे मालिकेत स्मिता म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी जान्हवी नसणार म्हणून सेटवरील कलाकारही भावुक झालेले दिसले. अभिनेत्री सुलेखा तळवलकर तसेच रमा म्हणजे शिवानी मुंढेकर यांनाही अश्रू अनावर झाले आहेत.
मालिकेतून एक्झिट घेण्याचे कारण सांगत स्मिताने खुलासा केला आहे की, “आयुष्यात असे काही निर्णय असतात जे आपल्याला परिस्थीतीनुसार घ्यावे लागतात. आता कबीर खूप लहान आहे आणि त्याला सांभाळायला कोणीही नाही म्हणून मी असा निर्णय घेतला की मी पुण्याला माझी आई राहते तिच्या जवळपास राहीन म्हणजे मी कामानिमित्त बाहेर असताना तीदेखील कबीरकडे लक्ष देऊ शकेल. म्हणजे त्या दरम्यान निदान मला चित्रपट, वेबसीरिजचं शूटिंग करता येईल. कारण डेली सोपचे शूटिंग २०-२० दिवसांचं असतं आणि ते करण मला शक्य नाही”.
पुढे ती म्हणाली, “मुंबईत राहून हे शक्य नाही कारण मुंबईमध्ये कबीरची काळजी घेणारं कोणी नव्हतं. आणि माझं पहिलं प्राधान्य कबीर असल्यामुळे मला हे सगळं करताना काहीही वाटणार नाही. कारण यामुळे मला त्याला जास्त वेळ देता येईल. तो लहान असल्यामुळे त्याला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे.मी मालिका सोडण्यामागचं कारण तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे मालिकेत जी कोणी नवीन जान्हवी येइल तिला स्वीकारा”, असंही ती म्हणाली आहे.