Amruta Deshmukh On Casting : टेलिव्हिजन विश्व हे नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतं. टेलिव्हिजनवरील मालिका या नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडत नाहीत. अगदी सातच्या ठोक्याला प्रत्येक घरात मालिकांचे टायटल साँग लागलेले ऐकू येतात ते थेट १०-११ च्या सुमारास बंद होतात. महिलावर्गाचा तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बरं या सगळ्यात मालिकांचा टीआरपी तर नेहमीच चर्चेत असतो. मालिकांच्या टीआरपी मालिकाविश्वात बरेचदा महत्त्वाचे ठरतात. या मालिका टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. या सगळ्याला कलाकारांच्या भूमिका, अभिनय जबाबदार ठरतात.
टेलिव्हिजन विश्वात बरेचदा मालिकाविश्वातील तेच तेच चेहरे पाहायला मिळतात. कारण एकेकाळी या चेहऱ्यांमुळेच या मालिकांनी टीआरपीची शर्यत गाजवलेली असते. हे चेहरे हळूहळू प्रेक्षकांच्याही मनाचा ठाव घेतात. प्रेक्षकांनाही कालांतराने मालिकांमध्ये तेच चेहरे पाहण्याची सवय होते. त्यामुळे मालिकाविश्वातील कास्टिंग हा एक नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. या प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपली मत मांडली आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि मालिकाविश्वातील कास्टिंगला टोकलं आहे.
अभिनेत्री अमृता देशमुख नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ती तिच्या युट्युबवर व्हिडीओ शेअर करत नेहमीच न पटलेल्या मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करते. अशातच अभिनेत्रीने आता शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिने चॅनेलच्या लोकांना एखाद्या प्रोजेक्टसाठी मुख्य भूमिकांत काम केलेलेच कलाकार हवे असतात हा मुद्दा मांडला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता म्हणते, “कलाकाराच्या आयुष्यात ऑडिशन देणं हा प्रकार दात घासण्याइतका रोजचा असतो. पण माझ्या आयुष्यात तो वेदनादायी झाला आहे. कारण माझ्या आयुष्यात ऑडिशन प्रासंगिक आणि वेदनादायीच आहे. आणि याचे तीन-चार प्रकार आहेत”.
आणखी वाचा – “मी जिवंत आहे”, निधनाची खोटी बातमी देताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते भडकले, म्हणाले, “स्पष्टीकरण देऊनही…”
यापुढे ती पहिला प्रकार सांगत असं म्हणते, “जसं मलायका अरोरा जीमला जाताना तिच्या पाठीमागे पापाराझी धावतात. तसंच ज्या क्षणी मला कळतं की, एखाद्या चॅनेलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे. त्यानंतर लगेचच असं कळतं की, या प्रोजेक्टसाठी अगोदरच कास्टिंग झालेलं आहे. कुणाचं? तर माजी लीडचं (मुख्य)… म्हणजे एकतर दुसऱ्या चॅनेलवर त्यांनी मुख्य भूमिकेत काम केलेल असेल किंवा त्याच चॅनेलवर ज्यांनी मुख्य भूमिकांमध्ये काम केलं आहे”. यापुढे अमृता सांगते, “या लोकांना मासिक भिशी तत्त्वावर चॅनेलने थांबवून ठेवलेले असतं. कारण त्यांना तेच हवेत. या इच्छुक कलाकारांच्या महासागरात चॅनेलला इतर काही रत्न मिळालेली असतात, ती त्यांना जपून ठेवायची असतात. कारण या रत्नांशिवाय टीव्ही इंडस्ट्रीचा, डेलीसोपचा रत्नहार होऊच शकत नाही. नाहीतर तो हार विकलाच जाणार नाही”.





