मतदार संघात नाव न आल्याने किंवा मतदार यादीतील नाव चुकणे यासारख्या अनेक घटना प्रत्येक निवडणुकीत ऐकायला, पाहायला किंवा वाचायला मिळतात. याबद्दल प्रत्येकवेळी मतदार जबाबदारी व जागरूकता म्हणून आपली तक्रार निवडणूक आयोगाकडे करतात. मात्र तरीही यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला दिसत नाही. याबद्दल अनेक कलाकारांनीही अनेकदा तक्रार, संताप व्यक्त करत आपलं म्हणणं मांडलं आहे. तरीदेखील यावर काहीच उपाय अजून निघालेला नसल्याचं दिसून येत आहे.
नुकतीच गायिका सावनी रविंद्रने टिचे मतदार यादीत नाव नसल्याने तिला मतदान न् करताच परत यावे लागले आहे. याबद्दल तिने सोशल मीडियाद्वारे संतापजनक पोस्टही शेअर केली आहे. अशातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळक याच्याबाबतही असाच काहीसा प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे. मतदार यादीत अभिनेत्याचं नाव चुकलं असून त्याबद्दल त्याने अर्जही केला होता. मात्र त्यात काहीच सुधारणा झाली नसून यावर्षीही मतदार यादीत त्याचे नाव न आल्याने यंदाच्या निवडणूकीत त्याला आपला मतदानाचा अधिकार बाजवता आला नसल्याचे त्याने म्हटले आहे
सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्याबरोबर घडलेला प्रकार नमूद केला असून या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता ह्यावेळी सुदैवाने ओनलाईन पोर्टल वर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना (त्यात तीच चूक होतीच.)
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “वोटींग बूथला सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ओनलाईन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते कळले. म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी व शोधाशोध केली”.
यापुढे सुयशने आपली खंत व्यक्त करत असं म्हटलं की, “मी गेली अनेक वर्ष न चुकता मतदान करत आलो आहे. पण यावेळी मात्र मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही ईतर पर्यायानेदेखील मला मतदान करू दिले नाही याची मला खंत वाटते आणि यापुढेही ती वाटत राहील.” त्याचबरोबर त्याने “दुर्दैवाने मला मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला कारण यावर्षी माझे नाव गूढपणे यादीतून गायब झाले” असंही म्हटलं आहे.