sumeet raghvan shares video about traffic : सध्या सर्वत्र ट्रॅफिकमुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाने घेरलं आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांत वाहतूक कोंडीचा जबर सामना प्रवाशांना करावा लागत आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणूस या नेहमीच्या ट्रॅफिकच्या त्रासाला वैतागला आहे. याचबरोबर अनेक कलाकारही या नेहमीच्या वाहतूक कोंडीला त्रासले आहेत. सेटवर जाताना, शूटला जाताना वा एखाद्या कार्यक्रमाला जाताना नेहमीच या कलाकारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. बरेचदा ही कलाकार मंडळी हा राग सोशल मीडियाद्वारे व्यक्तही करतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेता आस्ताद काळेने ठाणे घोडबंदर रोडवरील वाईट अवस्था आणि ट्रॅफिकबाबत आवाज उठविला.
यानंतर आता अभिनेता सुमित राघवननेही अशाच त्रासाला सामोरे जाण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर सुमित बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत वा स्पष्टपणे न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. अशातच सुमितने इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबईतील ट्रॅफिकची भीषण परिस्थिती दाखविली आहे. शिवाय या वाहतूक कोंडीदरम्याम त्याने शेंगदाणा विक्रेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा आता ब्रिजवरसुद्धा दिसायला लागला आहे, कमाल आहे”, असं त्याने म्हटलं आहे.
आणखी वाचा – सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या या व्रतामागची कथा आणि शुभ मुहूर्त
पुढे व्हिडीओमधून त्याने ब्रिजवरील प्रचंड वाहतूक कोंडीची दृश्ये दाखवली आहेत. आणि असं म्हटलं आहे की, “बांद्रावरुन सांताक्रूझच्या दिशेने उतरणारा पूल, त्यावरुन जे ट्रॅफिक खाली उतरतं ते, तसंच ब्रिजवरील खाली उतरणारे ट्रैफिक आणि सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने खालून येणारं ट्रॅफिक. असे तीन प्रवाह एकाच ठिकाणी येतात. तर मला अधिकाऱ्यांना, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाला विचारायचंय… तुम्ही बसून ठरवत नाही का? की जर तीन प्रवाह एकाच ठिकाणी आले, तर तिकडे गोंधळच होणार आहे. कॉमन सेन्स असतो ना? म्हणजे काय फायदा झाला करोडो रुपये खर्च करुन?”.
यानंतर त्याने व्हिडीओमध्ये पुढे ब्रिजच्या भिंतीवर थुकले असल्याचं दृश्य दाखवत “इकडे थुंकूनसुद्धा ठेवले आहे. बरं का? सामान्य माणूससुद्धा काही कमी नाही” असं म्हटलंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने असं लिहिलं आहे की, “कॉमन सेन्सचा दुष्काळ. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. ४५ मिनिटं लागली हा नवीन ब्रिज पार करायला”, असं म्हणत सत्य परिस्थिती दाखवत संताप व्यक्त केला आहे.





