कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांना अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. कोर्टाने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगबाबत दाखल करण्यात आलेली ईडीची सर्व प्रकरणं रद्द केली आहे. अशातच आता अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. सामाजिक-राजकीय घडामोडींवर किरण माने सातत्याने पोस्ट लिहित असतात.अशातच त्यांनी डी. के. शिवकुमार यांच्यावर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Kiran Mane On D K Shivkumar)
किरण माने यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत, “ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला. खरा जिगरबाज. बघा रे, ईडीला घाबरुन सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो तुमच्यावर पुढच्या पिढ्या कुत्सितपणे हसणार आहेत आणि या डी.के. शिवकुमार सारख्या सच्चा लढवय्याला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. मेंदूत कोरुन ठेवा. त्रास सहन करुन स्वत्व टिकवणार्या स्वाभिमानी योद्ध्यांची नाव इतिहास सुवर्णाक्षरात कोरतो. लाचारी पत्करुन तात्पुरती पदं मिळवणार्या भेकडांना उकीरड्यावर फेकून देतो. काॅंग्रेस पक्षाचा कर्नाटकातला हा खांदा वीर द रियल हिरो डी.के.शिवकुमार. माजी उर्जामंत्री. ईडीची चौकशी छाताडावर झेलली. सत्ताधार्यांना भिक घातली नाही. मनी लॉन्ड्रींगच्या केसेस झाल्या. बदनामी झाली. पन्नास दिवस तुरुंगवास सोसला. सहा वर्ष झुंज दिली आणि काल सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या केसेस ‘बोगस’ असल्याचे सांगत डी. के. शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता केली”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “डी.के. यांनी इतर कणाहीन नेत्यांप्रमाणे शेपूट घालून सत्तेत प्रवेश केला असता तर मुख्यमंत्रीही झाले असते. पण जनतेत छी थ्थू झाली असती. लोकांच्या नजरेतून ते कायमचे उतरले असते. पद आणि खोकी येतात तशी जातातही. पण इज्जत आणि बाणेदारपणा हजारो वर्ष तुमचं नांव टिकवतो. ईडीची धाड पडली की मिडीयावाल्यांच्या हिंस्त्र झुंडी बदनामी करायला मोकाट सोडली जातात पण हा वाघ सुटून आल्यावर त्यांच्यावर खोट्या केसेस लादणार्या व्यवस्थेला जाब विचारणारा एकही ‘माई का लाल’ आज मिडीयात शिल्लक नाही. इतिहासातल्या सगळ्यात नीच स्तरावर आपल्या देशाची लोकशाही पोहोचली आहे याचा हा पुरावा”.
त्यांची स्तुती करत ते असंही म्हणाले आहेत की, “डी.के खरंतर तुमची हत्तीवरुन मिरवणूक काढावी असं वाटतंय. तुमच्या संघर्षाला मुजरा करावा वाटतोय. पण एक लक्षात ठेवा, बदनामीचे घाव झेलूनही वर्चस्ववाद्यांपुढे न झुकलेल्या महामानवांना या देशाने कायम मनामेंदूत कोरुन ठेवले आहे. आम्हाला त्यासाठी खोटे सिनेमे काढून कुणाची खोटी भलावण करायची गरज नाही. सुर्याला त्याच्या प्रकाशाची जाहिरात नाही करावी लागत. तुम्हाला तुमचा मान आणि आदर पुर्वीपेक्षा हजारपटींनी परत मिळणार. तुमच्या नावात ‘शिव’ आहे. बहुजनांचा आद्य महानायक”, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.