‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं खळखळवून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे आजवर अनेक कलाकारांना मोठं होण्याची संधी मिळाली. हास्यजत्रेमुळे या कार्यक्रमातील कलाकार घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमामुळे कायमच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरव मोरेने काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला रामराम ठोकला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला निरोप दिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं आणि हास्यजत्रा सोडल्याने नाराजी दर्शिविली. (Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra)
अशातच गौरव मोरेने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने हास्यजत्रा सोडण्याबद्दल भाष्य केलं आहे. हिंदी इंडस्ट्रीत गेल्यावर गौरवला ट्रोल केलं गेलं. त्यावेळी एका नेटकऱ्याने हास्यजत्रा सोडण्यावरुन केलेल्या कमेंटवर गौरव मोरेने उत्तर देत यामागे काही कारण असतात, दादा, असं म्हटलं होतं, ही नक्की कारण कोणती याचं उत्तर आता गौरवने या मुलाखतीत दिलं आहे. याचं उत्तर देत गौरव म्हणाला, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेली पाच वर्षे मी काम करत आहे. इथे काम करताना या पाच वर्षात तोचतोचपणा आला होता. स्किटमध्येही माझ्या प्रतिक्रिया या आपोआप यायच्या. नंतर नंतर तर मला स्किटमध्ये कळू लागलं की आता समोरचा आपल्या वाक्यानंतर काय प्रतिक्रिया देणार आहे.
पुढे तो म्हणाला, “हे सर्व मला कळत होतं. आणि तेचतेच माझ्याकडून होत होतं. नवीन असं मला काही कळत नव्हतं. त्यामुळे मला थोडीशी ब्रेकची गरज होती. म्हणून मी थांबायचा निर्णय घेतला. तेव्हा सर म्हणाले की, घे तू ब्रेक आणि दोन-तीन महिन्यांनी परत ये. मी त्यांना नाही असं म्हटलं. आणि तोचतोचपणा येत असल्याचं सांगितलं. पाच वर्ष एकच काम करत आहे. या कार्यक्रमाने मला सर्व काही दिलं आहे. पण एक कलाकार म्हणून मला काहीच नवीन सुचत नाही आहे. नवीन प्रतिक्रिया सुचत नाहीत. मी थोडं थांबतो असं त्यांना सांगितलं”.
“त्याच्यानंतर मी वेगळं असं काही केलं नाही. चित्रपट पाहिले. माझेच मी एपिसोड बघत होतो काय चुकलं ते जाणून घेतलं. मी स्वतः काय करतोय याचा अभ्यास करण्यासाठी मी वेळ घेतला. कारण काय होत की, टीव्हीवर मी दिसत होतो, इव्हेंटमध्ये मी दिसत होतो. त्यामुळे खूप दिसणं दिसणं होत होतं अर्थात ते चुकीचं नाही आहे पण ते अति प्रमाणात होत होतं. आणि त्यात माझ्याकडून नवीन असं काहीच येत नव्हतं. मला नवीन काही सुचत नव्हतं”.