सिनेसृष्टीत काम करत असताना अनेकांच्या आयुष्यात चढ-उतार हे येत असतात. बरेचदा दिग्दर्शक व निर्माते मंडळींना चित्रपट भरपूर चालून यश मिळतं. तर काहींच्या चित्रपटाला तितकंसं यश मिळत नाही. सिनेसृष्टीत काम करताना ही मंडळी अगदी कशाचाही मागचा पुढचा विचार न करता कलाकृती उत्तम होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशाच एका मराठमोळ्या दिग्दर्शकाला त्याच्या पहिल्याच चित्रपटाचा अनुभव हा वाईट व चांगला कसा आला याबाबत त्याने सांगितलं आहे. हा दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तर काही आशयघन अशा चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुराही त्याने पेलवली आहे. (Prasad Oak On Financial Crisis)
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसादने त्याच्या कच्चा लिंबू चित्रपटादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. अभिनेत्याने कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, “‘कच्चा लिंबू’ हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा घटक आहे. याला मी चित्रपट म्हणणार नाही. कच्चा लिंबूने मला खूप काही दिलं आहे. अर्थात यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी माझ्या हातातून गेल्या. पण, हाच एक प्रवास आहे. ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’. कच्चा लिंबूला रसिक श्रेय अजिबात मिळालं नाही. तो चित्रपट एक ते दोन आठवडे अगदी कसाबसा चालला. त्यानंतर तो चित्रपट उतरला. पण, त्या माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. असं भाग्य कुठल्या दिग्दर्शकाच्या नशिबात असतं?, की पहिलाच चित्रपट आणि त्या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. हा चित्रपट वेगळ्या विचाराने केला होता. विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा असलेला दृष्टीकोन काय आहे आणि कसा बदलला पाहिजे, एखाद्या सण-समारंभात लोक त्या मुलाकडे कशा नजरेने बघतात. लोकांच्या त्या नजरेचा संबंधित मुलाच्या आई-वडिलांना भयंकर त्रास होत असतो. ती नजर त्यांच्या आई-वडिलांना टोचत असते. त्यामुळे ही विशेष मुलं समारंभाला येत नाहीत. कालांतराने पालकही अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. आणि अगदी कुडत कुडत ती माणसं आयुष्य जगत असतात. पण, तो मुलगा तसा आहे यात त्या मुलाचा दोष काय आहे?. त्याला कळतंच नाही आपण कसे जगणार आहोत आणि कसे आलो आहोत. हे भीषण मुलांच्या आई-बाबांना प्रचंड भोगावं लागतं. त्यामुळे समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी अत्यंत प्रामाणिक हेतूने बनलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी मी पावणे-दोन वर्ष मी इतर काही काम केलं नाही”.
पुढे तो म्हणाला, “प्रत्येक चित्रपटासाठी मी मेहनत घेत असतो. त्यात काही मोठेपणा नाही. पण, त्या चित्रपटासाठी मी जवळपास पावणेदोन वर्ष मेहनत घेतली होती. त्या काळात मी काहीच इतर काम केलं नाही. आपण काहीच काम केलं नाही हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा कर्जाचे हप्ते जास्त झाले आणि बँकेच्या माणसांचे फोन येऊ लागले. तेव्हा लक्षात आलं. अरे आपण काही कमावलेलंच नाही. पण, आपण काही कमावलं नाही म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीत ते चालूच राहतात”.
“त्या दोन वर्षात काम न करणं एवढं गळ्याशी आलं की, पुण्यामध्ये मी एक छान टुमदार असं रो-हाऊस घेतलं होतं. ते घर खूपच सुंदर आणि दुमजली होतं. माझ्या बायकोने ते घर स्वत:च्या हातांनी शेणाने सारवलं होतं. त्या घरातील एक-एक ताट, वाटी, भांड सगळ्या गोष्टी पितळेच्या होत्या. तिने फार शोधाशोध करून ते सगळं शोधून आणलं होतं. त्या घरात स्टिलच्या वस्तू नव्हत्या. अगदी फ्रिजसुद्धा मातीचा आणला होता. समोर बैलगाडी बनवली होती. मागे खोटी विहीर, त्यावर मोट होती. त्या घरात आम्ही दोन वर्षे पुण्याला जाऊन-येऊन राहिलो. पण, ‘कच्चा लिंबू’च्या प्रवासात ती दोन वर्षे काम न केल्यामुळे बँकेचं कर्ज भरण्यासाठी मला नाईलाजास्तव ते घर विकावं लागलं. ते घर विकून मी माझ्या बायकोच्या आनंदावर विरजण टाकलं. खरंतर मला तो अधिकार नव्हता. एक कलाकृती चांगली व्हावी म्हणून मी इतर काही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला माझ्या बायकोची पूर्ण संमती होती. तिला विचारून मी हे पाऊल उचललं होतं. पण, शेवटी नाईलाज म्हणून मला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं आणि आम्ही ते घर विकलं”.
पुढे तो असंही म्हणाला की, “दोघांचं खूप काळ पाहिलेलं स्वप्न म्हणजे ते घर होतं. माझी मुलं लहान असताना तिथे जायची. झोपाळ्यावर बसायची. माझे वडील तिचे वडील होते ते देखील त्या घरात यायचे. आज ते घर माझ्या हातात नाही आहे. aमाझं घर गेलं पण, त्याच ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाने मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तो आनंद जर तराजूत टाकायला गेलं तर तर दोन्ही पारडी सारखी आहेत. एका प्रामाणिक कलाकाराला पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं आणि दुसरीकडे घर या दोन्ही गोष्टींचं मूल्य माझ्यासाठी सारखी आहे. फक्त घर गेलं आणि राष्ट्रीय पुरस्कार मला मिळालं. चित्रपटाचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलं. जगभरात अनेक फेस्टिव्हल्समध्ये त्या चित्रपटाचे शो दाखवण्यात आले होते. समीक्षकांच्या दृष्टीकोनातून तो अतिशय सुंदर चित्रपट होता पण, व्यावसायिकदृष्ट्या तो चित्रपट फ्लॉप ठरला”.