‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही विनोदी कलाकारांचं आयुष्यच बदललं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर विविध पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिच्या लॉली या पात्रावर तर प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक भरभरुन प्रेम करतो. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. प्रेग्नेंसीनंतरचा काळ तिच्यासाठी खूप कठिण होता. याचबाबत तिने आता भाष्य केलं. आहे.
‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नम्रताला “तुला कधी नैराश्यचा सामना करावा लागला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागातच मला कळालं की, मी गरोदर आहे. मोटे सरांना मी सांगितलं की, सर मी गरोदर आहे. तेव्हा ते म्हणाले, अरे बापरे अभिनंदन. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्याक्षणी त्यांच्यातील एक निर्माता, लेखक जागा झाला. पण त्याचबरोबरीने मित्र म्हणून त्यांना छानही वाटलं. यासगळ्या परिस्थितीमध्ये प्रसाद, समीर दादा, मोटे सर, गोस्वामी सर, सोनी मराठी, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम यांनी मला बराच पाठिंबा दिला”.
“जवळपास लग्नाच्या सहा वर्षांनी मी गरोदर राहिले होते. खूप प्रयत्न करुनही मला बाळ होत नव्हतं. अखेर मी आई होणार होते हा माझ्यासाठी वेगळा आनंद होता. मोटे-गोस्वामी सरांनी मला विचारलं की, तू कार्यक्रम पुढे करशील ना… तेव्हा मी त्यांना म्हटलं की, सर शक्य तेवढं मी करेन पण कितपत मला काम करायला जमेल हे माहित नाही. तेव्हा ते मला म्हणाले, तू जेवढे एपिसोड करु शकतेस तेवढे एपिसोड कर. मी जवळपास सात महिन्यांपर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम केलं. सात महिन्याचं पोट घेऊन मी काम करत होते. डिलिव्हरी झाली. सहा महिन्यांचा मी ब्रेक घेतला. माझ्या बाळाला मी वेळ दिला. त्यानंतर पुन्हा मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जेव्हा आले तेव्हा माझं वजन वाढलं होतं. अंगाला सूज होती, आई होते, तीन महिन्यांचं बाळ माझ्या पदरात होतं. काम करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझ्याकडून पहिल्यासारखं काम होत नाही. नमा हे असं कर, ते तसं कर असं मला सांगण्यात येत होतं. माझ्यासाठी ते चांगलंच होतं. पण माझ्याकडून पहिल्यासारखं काम होत नाही हे मला जाणवत होतं”.
“एक दिवस असा आली की, मी हे काम सोडते मला जमत नाही. असाही क्षण माझ्या आयुष्यात आला. मी ढसाढसा रडले. प्रसादजवळही रडले. मोटे सरांना तेव्हा कळालं की, मी रडत आहे. बॅकस्टेजला येऊन मी मोटे सरांना म्हटलं की, सर मला जमत नाही. मी थांबते. मला माझ्या भूमिकांना योग्य तो न्याय देता येत नाही. पण मोटे सरांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी दमदार कमबॅक केलं”. नम्रताने आजवर केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. तसेच तिच्या बोलण्यामधून तिची संपूर्ण मेहनत दिसून आली.