Mumbai heavy rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबईत अक्षरशः थैमान घातलं आहे. सोमवारी रात्रीपासून झालेली पावसाची सुरुवात अगदी काल रात्रीपर्यंत सुरु होती. मुंबईत तर हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता. तसेच शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली होती. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. यादरम्यान मुंबईची लाईफलाईन रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळाली. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचलेले दिसले. या दरम्यान अनेक कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागला.
सार्वजनिक मार्गाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रवासाचा फार वाईट अनुभव आला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून पायी वाट काढत अनेक नागरिक कामाच्या ठिकाणी वा घरी पोहोचले. सामान्य मुंबईकरांबरोबरच मालिकाविश्वातील कलाकार मंडळींनाही शूटिंगसाठी सेटवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. अनेक कलाकारांनी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मालिकेचा सेट गाठलेला पाहायला मिळाला. याचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.
मनोरंजनाला ब्रेक नाही म्हणत स्टार प्रवाह वाहिनीच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील कलाकार गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढत सेट गाठल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याच मालिकेतील अभिनेत्री रेवती लेले हिनेदेखील इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पावसाने त्यांचे झालेले हाल दाखवले. यावेळी तर मालिकेतील कलाकारांनी घरी जाण्यासाठी चक्क ट्रकने प्रवास केला.
पावसाच्या पाण्यातून वाट काढतानाचा हा अनुभवव रेवतीने तिच्या शब्दांत व्यक्त केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काय दिवस होता. संपूर्ण शहरात पाणी साचलेले, रस्ते जलमय आणि आम्हाला आमच्या गाड्याही सेटच्या बाहेर पार्क कराव्या लागल्या. तुम्ही कल्पना करु शकता का, आम्ही सेटवर कसे पोहोचलो? तर ट्रकने खरंच, “शो मस्ट गो ऑन.” आणि तो झाला सुद्धा! संपूर्ण टीम, क्रूपासून कलाकारांपर्यंत सगळे वेळेवर पोहोचले आणि दिवसभर कुठलीही तक्रार न करता काम केलं. सगळ्या टीमचं खूप कौतुक”.





