कलर्स मराठी वरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. स्वामींवर निस्सीम प्रेम, भक्ती, श्रद्धा असलेला प्रत्येक कलाकार या मालिकेच्या रूपातून मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच स्वामींच्या भूमिकेतील अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्यावर प्रेम करतात. अक्षय यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल, त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत, त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. नुकताच दिवाळी पाडवा निमित्त अक्षय यांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अक्षय यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा खुलासा केला. (Akshay Mudawadkar Lovestory)
आज अक्षय यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या या प्रेमकहाणीची सुरुवात सांगत अक्षय म्हणाले, “अगदी पहिलीपासून मी व माझी पत्नी एकाच शाळेत होतो. आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. ‘स्वामी विवेकानंद’ या शाळेत आम्ही शिकत होतो. आमच्या शाळेत प्राथमिक व माध्यमिक असे दोन विभाग होते. त्यात आम्ही प्राथमिक शिक्षण घेताना वेगळे होते, कारण नेहाची सकाळची शाळा असायची आणि माझी दुपारची. पण माध्यमिकमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही एकत्रचं होतो. ही झाली शाळेची गोष्ट”.
पुढे अक्षय म्हणाले, “त्यानंतर बराच काळ लोटला. मी नाशिकमध्ये एका कंपनीत जॉब करत होतो, तेव्हा ही मला तिथे भेटली. ही शाळेनंतरची माझी आणि तिची पहिली भेट. त्यानंतर आम्ही शाळेतले मित्र मंडळी एकदा भेटायचं ठरवलं, आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो. एकमेकांमधील बोलणं सुरू झालं, कालांतराने ते बोलणं वाढत गेलं. आणि आम्ही प्रेमात पडलो. खरं सांगायचं तर आम्ही अजून तरी एकमेकांना कधीच प्रपोज केलेला नाही. बोलणं वाढलं तशा गोष्टी आपोआप पुढे सरकत गेल्या”.
यावर अक्षय यांची पत्नी नेहा बोलताना म्हणाल्या, “सुरुवातीला मी कामानिमित्त पुण्यात राहत होते, पण माझं घर नाशिकला होतं. आणि तेव्हा मी पुण्यात अन् अक्षय नाशिकला असं सुरू होतं. मी नाशिकला गेले की आम्ही भेटायचो. पण नंतर ही पोकळी आपसूकच जाणवू लागली, आणि अचानक असं वाटू लागलं की, आपण नाशिकला असायला हवं. त्यानंतर न बोलता ते प्रेम वाढत गेलं”.
यापुढे बोलताना अक्षय म्हणाले, “आमच्या लग्नाच्या गोष्टी ही अचानक घडल्या. अगदी महिनाभरात आम्ही लग्नसोहळा आणि इतर कार्य पार पाडली. खूप बैठका, बोलणी असं आमच्यात काहीच झालं नाही. सर्व व्यवस्थित व सुरळीत पार पडलं आणि खूप जलद गतीने पार पडलं. आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तर मलाच धक्का बसतो की, लग्नासारखा इतका मोठा सोहळा आपला अगदी महिन्याभरात उरकला. आज बोलता बोलता आमच्या संसाराला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत”.