Shirke Descendants Objection On Chhaava : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या सिनेमाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्डब्रेक करत इतिहास रचला आहे. एका आठवड्यात तब्बल ३१० कोटींचा गल्ला या चित्रपटाने पार केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा असून त्यांची कारकीर्द मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. अभिनेता विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. याचदरम्यान राजेशिर्के कुटुंबाने ‘छावा’ सिनेमावर आक्षेप घेतला असल्याचं समोर आलं आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच महाराजच्या लेझीम नृत्य खेळण्यावरुन चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला होता, दरम्यान हा भाग वगळून चित्रपट प्रदर्शित केला. यानंतर आता चित्रपटाला घेऊन आणखी एक वाद समोर आला आहे.
शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेत शिर्केंना खलनायक दाखवण्यात आलं असून ते चुकीचं आहे आणि ते बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषद घेत दीपकराजे शिर्के म्हणाले की, “नुकताच ‘छावा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात खूप चुकीचा व मोडतोड करुन इतिहास दाखवला आहे. इतिहासामध्ये बदल करुन खूप चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात राजेशिर्केंची प्रत्यक्ष बदनामी केली आहे, कोणताही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसतानाही या कुठल्यातरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी या चित्रपटामध्ये आमच्या राजेशिर्कें कुटुंबाची बदनामी केली, त्याचा निषेध आम्ही करत आहोत. आम्ही दिग्दर्शक उतेकरांना, छावाचे लेखक आता नाहीत पण प्रकाशकांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवू. आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही शिवजयंतीमुळे १९-२० तारखेपर्यंत थांबलो होतो. चांगल्या कामात आणि छत्रपतींचा उत्साह साजरा करण्यात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही शिवजयंतीनंतर पत्रकार परिषद घेतली”.
आणखी वाचा – पंतप्रधान मोदींनाही ‘छावा’ची भुरळ, विकी कौशलच्या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, “महाराष्ट्र आणि मुंबई…”
यानंतर त्यांनी दिग्दर्शकांना मागणी करत म्हटलं की, “आमची एकच मागणी आहे ती म्हणजे चित्रपटातील आक्षेपार्ह व राजेशिर्के कुटुंबाची बदनामी करणाऱ्या बाबी लवकरात लवकर वगळण्यात याव्या आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात यावा. खूप सुंदर चित्रपट तयार केला आहे. चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात. जगापुढे खूप चांगला संदेश जात आहे. छत्रपती संभाजीराजे जगाला कळत आहेत. परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवला आहे, हे मी उतेकरांना सांगू इच्छितो. मी उतेकरांना जाहीर आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटात बदल करुन पुन्हा प्रदर्शित करावा, अन्यथा तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील”.
पुढे दिपकराज शिर्के म्हणाले, “राजेशिर्के परिवारावर होणारा अन्याय थांबला पाहिजे. इतिहास दाखवू नका असं आम्ही म्हणत नाही, पण योग्य आणि खरा इतिहास दाखवा. मोडतोड करुन, बदल करुन समजात तेढ निर्माण होते, असं कुठेही दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. उतेकरांनी चित्रपटात लवकरात लवकर बदल करावा नाहीतर त्यांचं महाराष्ट्रात फिरणं बंद करु असा इशारा मी त्यांना देतोय. आम्ही चित्रपटावर बंदी घालण्यासाठी आलो नाही, चित्रपट खूप सुंदर आहे पण खलनायक चुकीचा दाखवला आहे. त्यांनी जबरदस्ती इतिहासात बदल करत चुकीचा खलनायक दाखवला आहे, हे आम्ही सहन करणार नाही. आमची बदनामी आम्ही सहन करणार नाही”.