मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक क्षितिज झारापकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी क्षितिज यांनी जगाचा निरोप घेतला. आज सकाळी १०च्या सुमारास त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांनतर लगेचच ३.३०च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Kshitij Zarapkar Death)
मागील अनेक महिन्यांपासून क्षितिज यांची आजाराशी सुरु असलेली लढाई आज अयशस्वी ठरली. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार क्षितिज यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. ‘गोळा बेरीज’, ‘एकुलती एक’, ‘आयडियाची कल्पना’ यांसारख्या चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. अभिनेता म्हणूनच नव्हेतर अनेक चित्रपट व नाटक यांच्या दिग्दर्शन व लेखनातूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
तसेच आस्ताद काळे व अदिती सारंगधरच्या चर्चा तर होणारच या नाटकातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. क्षितिज यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अनेक दिवसांपासून ते आजाराशी लढत रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहितीही समोर आली आहे.