सुप्रसिद्ध गायक अदनान सामीने आजवर ‘लिफ्ट करा दे’, ‘माहिया’, ‘तेरा चेहरा’ यांसारखी सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी आजही रसिक प्रेक्षक आवडीने ऐकतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अदनान त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. अदनानचे वडील मुळचे पाकिस्तानी. यामुळे त्याला बऱ्याच कठीण परिस्थितीची सामना करावा लागला. पाकिस्तानातील भयावह परिस्थिती पाहता अदनाने कुटुंबासह कायमचं भारतात येण्याचं ठरवलं. २०१६मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं. त्यानंतर तो कायमचा भारतातच स्थायिक झाला. बऱ्याचदा अनेक मुलाखतींमध्ये अदनान पाकिस्तानाबाबत भाष्य करताना दिसतो. आताही त्याने सांगितलेला एक प्रसंग बराच चर्चेत आला आहे. (Adnan sami mother death)
अदनाने रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदालत’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच पाकिस्तानात पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्नही त्याला या कार्यक्रमात विचारण्यात आला. तेव्हा त्याने स्पष्ट उत्तर दिलं. २०२४मध्ये अदनानच्या आईचं निधन झालं. तेव्हा त्याने पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण दरम्यान अदनानला अगदी वाईट अनुभव आला. याबाबतच त्याने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – “मी कल्की अवतार पाहिलाय आणि…”, ममता कुलकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझं गोत्रही…”
आईचं जाणं अदनानसाठी मोठा धक्का होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर भारताला त्याने पाकिस्तानात जाण्याबाबत विचारलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्याला होकारही देण्यात आला. अदनान म्हणाला, “मी आपल्या देशातील सरकारला पाकिस्तानात जाण्यासाठी विचारलं. पण त्यांना याबाबत काहीच अडचण नव्हती. कारण परिस्थितीही तशीच होती. तुझ्या आईचं निधन झालं आहे तुला गेलंच पाहिजे असंही त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिजासाठी अर्ज केला. मात्र पाकिस्तानने तो स्वीकारलाच नाही. सरळ यासाठी नकार दिला”.
पुढे तो म्हणाला, “माझ्या आईचं निधन झालं होतं. तरीही त्यांनी मला पाकिस्तानात येण्यासाठी नाकारलं. मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाहीच. आईचं सगळे अंतिम संस्कार व्हॉट्सएप व्हिडीओद्वारे मी पाहिले”. अदनानसाठी हा काळ खूप वाईट होता. भारतात जास्त कमाई होते म्हणून तू इथलं नागरिकत्व स्वीकारलं का? असा प्रश्नही अदनानला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “नशिबाने माझा जन्म एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला. त्यामुळे मला पैशांची चिंता कधीच नव्हती. फक्त पैशांसाठी मी कधीच काही केलं नाही”. अदनान पाकिस्तानातच त्याची कोट्यवधींची संपत्ती सोडून भारतात कायमचा नव्याने स्थायिक झाला.