रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका साकरणाऱ्या दारा सिंग यांचे 2012 मध्ये वयाच्या 83व्या निधन झाले. ते एक कुस्तीपटूही होते. त्यांनी हिंदी मालिका तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘दादाजीं’ची भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. त्यांना तीन मुली व दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा विंदू दारा सिंह हादेखील हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. त्यानेही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकरल्या आहेत. (Vindu dara singh on dara singh death)
नुकताच विंदूने दारा सिंह यांच्या मृत्यूच्या वेळेचा एक किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की, “वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही शॅम्पेन पिऊन आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा खुद्द अमिताभ बच्चन यांनी तिथे येऊन ही चित्र पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला”.
पुढे तो म्हणाला की, “माझ्या वडिलांनी सांगितले होते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या आयुष्याचा आनंद साजरा करा. रडू नका’. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व कुटुंब एकत्र जमा झाले होते. रात्री कुटुंबातील सर्वजण म्हणजे भाऊ,बहीण,भवोजी सर्वच होते. आम्ही विचार केला की बाबांसाठी रडण्यापेक्षा आपण त्यांनी जगलेल्या आयुष्याचा आनंद साजरा करावा. त्यामुळे आम्ही शॅम्पेन पिण्यास सुरवात केली. पार्टी करण्यास सुरवात केली आणि ‘टू डॅड, टू डॅड’ बोलण्यास सुरवात केली.
पुढे त्याने सांगितले की, “आम्ही पार्टी करत असतानाच दरवाज्याची बेल वाजली.दरवाजा उघडून पाहिले तर समोर अमिताभजी उभे होते. ते सांत्वन करण्यासाठी आले होते. पण त्यांनी पार्टी बघून विचारले की हे नक्की काय चाललं आहे? मी उत्तर दिले की, माझ्या वडिलांनी आनंद साजरा करायला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी माझ्या आईबद्दल विचारले मी सांगितले की ती तिथे बसली आहे. ते माझ्या आईजवळ जाऊन बोलू लागले. पण त्यांना अजूनही घडल्या प्रकाराबद्दल आश्चर्य वाटत होते”.
विंदूने दारा सिंह यांच्या अनेक अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत.