महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वत्र राजकीय सभांचं भाषणांचं वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर व विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच सध्याची राजकीय परिस्थितीवर सामान्य माणूसदेखील सहभाग घेत आहेत. अशातच अनेक कलाकार मंडळीदेखील या राजकीय परिस्थितीवर आपली मतं व्यक्त करत आहेत. अशातच गायक, संगीतकार, कवी, दिग्दर्शक अवधूत गुप्तेने सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
अवधूत गुप्तेंनी नुकतीच मित्रम्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अवधूतला सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत अवधूतने असं म्हटलं की, “हे सगळे राजकारणी स्वत:चं म्हणतात की राजकारणाचा स्तर खाली गेला आहे. आता तो खाली गेला आहे म्हणजे काय की ज्या गोष्टीची पूर्वीच्या समाजाला किंवा राजकारणाऱ्यांना लाज वाटायची किंवा जी गोष्ट पूर्णत: अस्वीकारार्ह होती ती आता पूर्णपणे स्वीकारार्ह झाली आहे. एखाद्या नेत्याने किंवा मंत्र्याने पैसे खाल्ले किंवा तो खातो. ही गोष्ट आता सामान्यातल्या सामान्य माणसाला मान्य झाली आहे. हा या व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे.”
यापुढे त्याने जातीच्या राजकरणाबद्दल असं म्हटलं की, “आता जातीच्या राजकारणाला ते (नेते, राजकीय मंडळी) जबाबदार नाहीत, जबाबदार आपण आहोत. आपण सामान्य माणसं आहोत. प्रत्येकाला लायकीप्रमाणे सरकार मिळतं असं जे वाक्य म्हटलं आहे ते खरंच आहे. आजही अमुक जातीची, अमुक समाजाची वोट बँक आहे. ही वोट बँक कोणी केली, ही वोट बँक आपणच दिली ना. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरदेखील या देशात वोट बँक्स आहेत. तर ही सामान्य माणसांचीच चूक आहे. ही राजकीय लोकांची चूक नाही”.
दरम्यान, अवधूत गुप्तेने आजवर ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘एक तारा’ तसेच ‘कान्हा’सारख्या चित्रपटातून महाराष्ट्रातील सण-समारंभ व राजकारणावर भाष्य केले आहे. संगीतकार आणि गायक म्हणून त्याने मराठी संगीत विश्वाला एकापेक्षा एक सरस गाणी दिली. त्याच्या अनेक रॉकिंग अल्बमनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. शिवाय त्याने सिनेदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही जबाबदारी निभावली आहे.