अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. १२ जुलै रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर या भव्य लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राधिका व अनंतच्या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. या लग्नपत्रिकेबरोबर देण्यात येणाऱ्या खास स्पेशल भेटवस्तूने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. चांदीचा देव्हारा असणाऱ्या या लग्नपत्रिकेबरोबर खास भेटवस्तू देत त्यांनी पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. (Anant ambani Wedding invitation gift)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेच्या भव्य व विचारपूर्वक डिझाइनसाठीच नव्हे तर काश्मीरमधील कारागिरांनी हाताने बनवलेली दोरुखा पश्मिना शाल या उत्कृष्ट भेटवस्तूने देखील लक्ष वेधून घेतले आहे. अंबानी कुटुंबाने त्यांच्या लग्नातील पाहुण्यांना दोरूखा पश्मीना शाल भेट देण्यासाठी निवडली आहे. दोरुखा पश्मिना शाल कापडाच्या जगात लक्झरी व कलात्मकतेचे शिखर म्हणून उभी आहे. ही शाल अंबानी यांनी पाहुणे मंडळींना आमंत्रणासह भेट म्हणून दिली आहे.
काश्मीरमध्ये श्रीनगरच्या गाझी दूरी आलमगरी बाजारातील बेग कुटुंबातील गुलाम मुहम्मद बेग यांनी या ‘दोरूखा पश्मिना शाल’ कशी बनवली जाते, याचं महत्त्व काय आहे हे ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितलं. बेग म्हणाले की, “दोरुखा शालींवर नाजूक असं भरतकाम केलेलं असतं. ज्यामध्ये प्रति चौरस सेंटिमीटर एकूण ५०० टाके असतात. या शालीवरचं विणकाम हे खूपच गुंतागुंतीचं असतं कारण, या शालीवरची दोन्ही बाजूची डिझाइन तुम्हाला सारखीच दिसेल. त्यामुळे अशाप्रकारच्या दोरूखा पश्मिना शाल तयार करताना कारागीराचं कौशल्य पणाला लागतंच याशिवाय या कामासाठी प्रचंड संयम आणि वेळ द्यावा लागतो”.
पुढे ते असंही म्हणाले, “अनेकदा सुंदर अशा ‘दोरूखा जमावर शाल’ बनवण्यासाठी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या शालींवर कोणत्या पद्धतीचं वर्क केलंय यावर त्यांची किंमत आधारलेली असते. साधारणत: हलक्या प्रतिचं विणकाम केलेली शाल तुम्हाला १० ते १२ हजारांपर्यंत मिळते तर, चांगल्या प्रतिचं विणकाम केलेली शाल निश्चितच यापेक्षा महाग असते”.