मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेतच, पण याव्यतिरिक्त ते राजकरणातही तितकेच सक्रिय आहेत. अशा काही कलाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक लोकोपयोगी कामेदेखील केले आहेत. अशातच सध्या देशभरात निवडणूकांचं वारं वाहत आहे.
अमोल कोल्हे हे अभिनेते असण्याबरोबरचं शिरूर मतदारसंघाचे खासदारही आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या प्रचात व्यस्त असताना त्यानी मनोरंजन क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ब्रेक घेत असल्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अमोल कोल्हे यांनी नुकताच ‘साम मराठी’शी संवाद साधला.
आणखी वाचा – रुपालीने डाव साधला, राजाध्यक्ष कुटुंबीयच घेणार एकमेकांचा बळी, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेत नवं वळण
या संवादादरम्यान अमोल कोल्हे यांनी असं म्हटलं आहे की, “शिरूर मतदारसंघातले अनेक निर्णय आपण गेल्या पाच वर्षात मार्गी लावत आणले आहेत. पुणे-नाशिक महामार्ग किंवा पुणे-अहमदनगर महामार्ग असेल हे प्रकल्प येत्या काळात मार्गी लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इंद्राणी मेडीसीटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प येत्या काळात होणार आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज असणार आहे. शिरूरमधील आदीवासी मुलांसाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याचे प्रकल्प मार्गी आहेत.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “स्वत: लोकसभेचा उमेदवार असताना आठ लोकसभा मतदार संघामध्ये प्रचारासाठी मला जाताना पहिलं. त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना हा वेळ देणं शक्य नाहीये. त्यामुळे येत्या पाच वर्षांसाठी हा ब्रेक घेणं गरजेचं आहे. अनेक चाहत्यांची यांमध्ये निराशा होऊ शकते. मात्र शिरूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी का होईना मालिका विश्वातील अभिनयातून मला ब्रेक घ्यावा लागत आहे”.