मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक कलाकृतींमध्ये काम केलेलं आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत महत्वाची भूमिका करत आहे. शिवाय, त्या ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाटकांमध्ये काम करत आहे. त्यानिमित्ताने त्या राज्यातील विविध शहरांमध्ये त्यांच्या नाटकाचे प्रयोग करताना दिसतात. अशातच, निवेदिता यांनी नुकतंच सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या परिस्थितीवर भाष्य करताना आपला संताप व्यक्त केला आहे. (Nivedita Saraf on conditions of theatres in Maharashtra)
सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांना महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या परिस्थितीबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं. निवेदिता सराफ यात म्हणाल्या, “राज्यातील नाट्यगृहांची परिस्थिती काही बदलली नाही. आमच्यावेळीही अनेक नाट्यगृहांमध्ये कचऱ्याचा डब्बा नसायचा. अजूनही नाट्यगृहात कचऱ्याचे डब्बे नसतात. आपल्या लोकांनीच आपलं नाट्यगृह बांधलं. पण अजूनही लेडीज रुमला आतमध्ये टॉयलेट नाही. आता कित्येक स्त्रिया काम करतात. त्यांचे काही मासिक पाळीचे त्रास असतात, पण टॉयलेट नाहीत. कशाचा कुठलाही विचार केला गेला नाही”.
हे देखील वाचा – सासूने सोन्याच्या बांगड्या मागताच अमृता खानविलकरने सरळ नाही म्हणून दिलं उत्तर, म्हणालेली, “आठ लाखांची अंगठी मला हवी होती पण…”
पुढे त्या म्हणाल्या, “व्हिलचेअरवर जी व्यक्ती असते तिला जर नाटक बघायचं असेल, तर अशी सोय किती नाट्यगृहांमध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक करत असताना आम्हाला माईक न लावता नाटक करावं लागतं. कारण या नाटकात दहा व्यक्तिरेखा आहेत. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या विंगेमध्ये तुमचा आवाजच पोहोचत नाही. नाट्यगृहांमध्ये शासकीय कार्यक्रम होतात, आणि हे कार्यक्रम लांबतच जातात. पुणेमध्ये बालगंधर्वला जर प्रेक्षक ५.३० वाजताच्या प्रयोगाला आले आणि नाटक ६.०० वाजता सुरु झालं तर त्या लोकांनी कुठे उभं राहायचं? कुठे बाथरुमसाठी जायचं?. जोपर्यंत शासकीय कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत दरवाजेही उघडले जात नाहीत”.
हे देखील वाचा – औक्षण, पार्टी थीम, धमाल अन्…; प्रदीप वेलणकरांच्या ७५व्या वाढदिवसाची जोरदार पार्टी, अशोक मामांसह मराठी कलाकारांची हजेरी
“कलाकारही अशावेळी बाहेर उभे राहतात. मेकअप रुमही मिळालेली नसते. अलिकडेच आमच्या नाटकाचा प्रयोग होता त्याआधी नाट्यगृहामध्ये शाळेतील मुलांचा कार्यक्रम सुरु होता. मुलं आहेत मान्य आहे पण आम्ही मुंबईहून तडफडत प्रवास करुन आलो होतो. दुर्देवाने मला व सुयशला आवाज चढवायला लागला. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, “इतका वेळ थांबलात थोडं अर्धा तास थांबा ना…” सुरु असलेला कार्यक्रम वेळेत संपवण्याची सवय अजूनही आपल्याला लागलेली नाही. ५.३० वाजता जर नाटक सुरु असेल तर ते पंधरा मिनिटं उशिरा का सुरु होतं?. त्यामुळे सध्याची जी नाट्यगृह आहेत ती प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची खूप गरज आहे”, असं निवेदिता यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. एकूणच, निवेदिता यांनी राज्यातील नाट्यगृहांबाबत अगदी सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली आहे.