priya marathe death : सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सुस्वभावी, निरागस, मृदुभाषी अशी प्रियाची ओळख होती. आजवर प्रियाने केलेल्या अभिनयाला प्रत्येक चाहत्याने, प्रेक्षकांनी दाद दिली आहे. मात्र प्रियाचं हे असं अचानक जाण्याने अनेकांना भावुक केलं. प्रिया गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती यावेळी तिचा पती अभिनेता शंतनू मोघेने तिची साथ दिली. या काही पिरेडसाठी शंतनूने काम बाजूला ठेवून पत्नीला वेळ दिला. प्रियाच्या निधनानंतर आता शंतनू सावरताना दिसला आणि त्याने पुन्हा एकदा मालिकेद्वारे कमबॅक केलं.
‘शो मस्ट गो ऑन’ हे वाक्य प्रत्येक कलाकाराच्या तोंडून येतं. असंच म्हणणं आता शंतनू मोघेचं ही आहे. तब्बल १५ महिन्यानंतर शंतनूने ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून शंतनू मालिकाविश्वात परतला आहे. त्याच्या मालिकेतील सीनचा टिझर पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. १५ महिन्यांनंतर मालिकेत परतल्यानंतर शंतनूने हा मधला प्रवास कसा होता आणि त्याच्या या भूमिकेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला प्रतिक्रिया दिली आहे.
शंतनू म्हणाला, “मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो”.
आणखी वाचा – ‘या अली’ फेम गायक जुबिन गर्गचे धक्कादायक निधन, स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागला आणि…
पुढे त्याने असं म्हटलं, “कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे”. मालिकेतल्या भूमिकेविषयी तो म्हणाला, “मी मालिकेत साकारत असलेली शंतनु ही भूमिका आता नकारात्मक वाटत असली तरी तशी नाहीय. विविध भावभावनांच्या छटा पाहायला मिळतील. या मालिकेच्या निमित्तानं मी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे, त्यांनी मला समजून घेतलं”.





