महाभारत’ मालिकेमध्ये भगवान श्री कृष्णाच्या भूमिकेमुळे अभिनेते नितीश भारद्वाज घराघरांमध्ये पोहोचले. सध्या नितीश हे त्यांच्या कौटुंबिक कारणांमुळे चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज व त्यांच्या पत्नी यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. सध्या नितीश व त्यांची पत्नी स्मिता वेगळे राहत असून मुलींचा ताबा मिळावा यासाठी दोघांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश यांनी स्मिता यांच्याकडे मुलींचा ताबा असल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. (Nitish Bhardwaj on children custody)
‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश यांनी सांगितले की, “स्मिता माझ्यापासून वेगळी राहत आहे आणि ती सगळीकडे खोटी माहिती पसरवत आहे. मी माझ्या एका व्हिडीओमध्ये २३ मे २०२३चा न्यायालयाचा आदेश दाखवला होता ज्यामध्ये न्यायाधीशांनी मुलींचा ताबा अजून कोणालाही दिलेला नाही असे जाहीर केले आहे. यावर अजून चर्चा झालेली नाही. सर्व चर्चा झाल्यानंतरच मुलींचा ताबा कोणाला मिळणार हे ठरणार आहे.”
पुढे ते म्हणाले की, “जोपर्यंत मुलींचा ताबा मिळण्याचे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आई ही कस्टोडिअल पालक आहे आणि माझ्याकडे जर मुलांचा ताबा नसेल तर मुलांबद्दलची सर्व माहिती मला सांगणे गरजेचे असते. इतकेच नाही तर जेव्हा-जेव्हा ताबा घेण्याबाबत भांडण होते तेव्हा कायद्यानुसार कौटुंबिक न्यायालय आपोआप मुलाचे पहिले पालक बनते आणि नंतर नॉन- कस्टोडिअल पालक बनते. स्मिताने याबाबत कोणालाही सांगितले नाही.”
या सर्व प्रकाराचा परिणाम त्यांच्या मुलींच्या मनावर आणि त्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे नितीश यांनी सांगितले. ते म्हणाले की, “स्मितामुळे मुलींच्या शिक्षणाची फरफट होत आहे. दोघींच्याही भोपाळ व उटी या दोन शाळांमध्ये तब्बल ५ ते ६ महिन्यांचा खंड पडला. त्यादरम्यान मुलींनी अभ्यास केला की नाही हेदेखील माहीत नाही. मुलींच्या अभ्यासाबरोबरच मानसिक,शारीरिक व भावनिक अस्थिरता निर्माण झाली आहे.” नितीश आपल्या मुलींच्या बाबतीत खूपच भावुक असल्याचे दिसून येत आहे. तसेच आई-वडिलांच्या भांडणाचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी ते प्रयत्नही करत आहेत.