Hemant Dhome on hindi third language controversy : राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा पेटून उठणार असल्याचं चित्र दिसत आहे. इंग्रजी, मराठीबरोबरच हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला. यावर आता मराठमोळा या अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही भाष्य करत सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. अभिनेत्याने ट्विट शेअर करत या निर्णयावर टीका केली आहे. आजवर हेमंतने अनेकदा सामाजिक तसेच राजकीय वा न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बरेचदा तो दुर्दैवी घटनांवरही आपलं मत मांडताना दिसतो. अशातच आता हेमंतने सरकारने हिंदी भाषा सक्तीची करताच आवाज उठविला आहे.
हेमंत ढोमेने ट्विट करत असं म्हटलं की, “हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा. हिंदी ही तृतीय भाषा असेल. ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…”.
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 17, 2025
कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल…
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)
म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे… pic.twitter.com/H9XaXOvYw1
पुढे त्याने असं म्हटलं, “पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?”. हेमंतचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. सरकारनं २० इच्छुक विद्यार्थ्यांचा जो निमय केला आहे, त्यानं पालक तसंच विद्यार्थ्यांचीही दिशाभूल तर होत नाहीये ना…असा प्रश्न प्रत्येक स्तरातून विचारला जात आहे”.
शालेय शिक्षण विभागानं यंदा हिंदी ही पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्यानं प्रचंड विरोध झाला. त्यानंतर दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. या वर्षी पहिलीपासून तिसरी भाषा नसेल, असे त्यांनी जाहीर केले. मात्र त्याबाबत लेखी निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.





