जगभरात आजचा १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपले जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या जोडीदारांबरोबर सात जन्माची गाठ बांधली. मराठीतील अशा अनेक कलाकार जोडयांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते अतुल परचुरे व नृत्यांगणा, अभिनेत्री सोनिया परचुरे. आजच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त या कलाकार जोडीने ‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराबद्दल सांगितले आहे.
यावेळी अतुल परचुरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असे म्हटले की, “सोनियाचं लग्नाआधीचं आयुष्य बंगल्यात गेलं होतं आणि मी दोन खोल्यांमध्ये राहिलेला माणूस. पण लग्नानंतर त्या जागेत कोणतीही तक्रार न करता सोनिया राहिली. त्यावेळी मी तिला ‘आपण लवकरात लवकर नवीन घर घेऊ’ असं विश्वासानं सांगितलं होतं. मी आणि सोनिया एकाच क्षेत्रात काम करायचो; पण दोघंही एकाच क्षेत्रात नको म्हणून तिनं नाटक, चित्रपट, मालिकेतलं काम पूर्ण बंद केलं आणि नव्यानं तिच्या कथक क्लासेसच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या या धाडसी निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “अभिनयक्षेत्रात आर्थिक स्थैर्य नसतं. आज काम आहे तर उद्या नाही. पण सोनियाकडे ते स्थैर्य होतं. आम्हा दोघांमध्ये कोण किती कमवतं यावर कधीही चर्चा झाली नाही. उलट आम्ही एकमेकांसाठी पैसे गुंतवत असतो. मी चार महिने रुग्णालयात होतो, तेव्हा वर्षभर माझं काम बंद होतं. तेव्हा मी पूर्ण बरा होईपर्यंत घर, स्वत:चं करिअर सांभाळणं, संपूर्ण कुटुंबाला धीर देणे तसेच त्या परिस्थितीत तिने खंबीरपणे सगळ्या गोष्टी पार पाडल्या”.
आणखी वाचा – यंदाच्या वर्षीही प्राजक्ता माळी सिंगल?, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्वत:च खुलासा करत म्हणाली, “प्रेम करु..”
यापुढे अतुल यांनी त्यांच्या सुखी संसाराचे गुपित सांगत असे म्हटले की, “आम्ही एकमेकांवर आमच्या आवडीनिवडी, मतं कधी लादली नाहीत. मला मित्रांबरोबर बाहेर जायचं असेल तर कधीही तिच्याशी खोटं बोलण्याची वेळ येत नाही. उलट ती मला सांगत असते की, मित्रांबरोबर तुझा छान वेळ जातो, तर तू आनंदानं त्यांना भेटायला जात जा.”
यापुढे अतुल यांनी सोनिया यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करत असं म्हटलं की, “सोनियाशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय होता. त्याचा मला कधीही पश्चाताप झाला नाही आणि होणारही नाही. माझ्यासारख्या आज वेगळं आणि उद्या वेगळं असं वागणाऱ्या माणसाला इतकी वर्षं तिनं सांभाळलं याबद्दल मी तिचा कायम आभारी आहे”.