अशोक सराफ हे नाव घेतलं की त्यांचा आतापर्यंतचा सिनेविश्वातील प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी आजही सिनेविश्वात काम करण्याची ओढ त्यांची कुठेही कमी झालेली जाणवत नाही. एक काळ मराठी सिनेविश्वात गाजवलेल्या या नटाला कोण ओळखणार नाही असं होणं शक्यच नाही. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अशोक सराफ यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीमधील अनेक किस्से आजवर आपण ऐकलेत, वाचलेत. कधी हे किस्से मनोरंजन करण्यास तत्पर असतात तर कधी या किस्स्यांमधुन बरच काही शिकण्यासारखंही असत. अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे.(Ashok Saraf Incidence)
कोल्हापूरला शूटिंग असलं की अशोक मामा नेहमीच ट्रेनने प्रवास करत. ज्यावेळी त्यांनी निर्मात्यांना तिकीट काढायला सांगितलं तेव्हा ते म्हणाले होते, कशाला उगाच माझं फर्स्टक्लासचं तिकीट काढतोस, मला चालेल थ्री टियर. एरवी मी टू टियरनं जातो, पण यावेळी थ्री टियरमध्ये कॅमेरामन वगैरे बाकीचा सगळा स्टाफ होता. मनात म्हटलं, त्यांच्याशी गप्पा मारत जाऊ.
पहा का केला मामांनी ट्रेनचा प्रवास बंद (Ashok Saraf Incidence)
रात्री आठ वाजता सीएसटी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसनं अशोक मामा निघाले होते. या दरम्यानचा एक किस्सा सांगत मामा म्हणाले, एरवी एकटा असलो की गाडीनं स्टेशन सोडल्यावर मी झोपायच्या तयारीला लागायचो. माझी तेव्हाची ही नेहमीची सवय. कोल्हापूरला जायचं असलं की या गाडीत बसायचं, मस्तपैकी ताणून द्यायच आणि सकाळी सात वगैरे वाजता कोल्हापूर स्टेशन आलं की उठायचं. त्या दिवशी सोबत असल्यामुळे आमच्या गप्पा सुरू झाल्या.(Ashok Saraf Incidence)
गाडी सुटून पंधरा-वीस मिनिटं झाल्यावर समोरच्या बाकावर बसलेल्या आणि आमच्या गप्पा ऐकणाऱ्या दोघा मित्रांपैकी एकाची चुळबूळ अशोक मामांच्या लक्षात आली. तेव्हा धीर करून त्यानं मामांकडे पाहत म्हटलं, ‘नमस्कार.’ मामांनीही त्याला नमस्कार केला. लगेच तो खिडकीच्या बाजूला बसलेल्या आपल्या दुसऱ्या मित्राकडे पाहून म्हणाला, ‘ओळखलंस का यांना? अशोक सराफ…’ यावर तो उत्तरला, ‘मी यांना केव्हाच ओळखलं होतं. पण मला वाटलं नव्हतं की हे थर्ड क्लासनं प्रवास करत असतील.”
तेव्हा मामा पुढे म्हणाले, मला त्या रात्री काही शांत झोप लागली नाही. च्यायला, या माणसानं आपला पार कचरा करून टाकला असं सारखं मनात येत होतं. सकाळी कोल्हापूर स्टेशनवर उतरलो तेव्हाच यापुढे पुन्हा सेकंड क्लासनं जायचं नाही असा निर्णय घेऊन टाकला. मामांचा थोडासा मिश्किल स्वभाव असल्याने त्या व्यक्तीच बोलणं मामांना चांगलंच लागलं, शिवाय त्यांचं सिनेसृष्टीत ही नाव मोठं झालं होत आणि म्हणूनच त्यांनी यापुढे तृतीय श्रेणीमधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला.